Ticker

6/Breaking/ticker-posts

डिजीटल युगातही हळदी कुंकवामुळे आपुलकी – कविता आव्हाड

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

पाथर्डी: सध्या जग सोशल मिडियाच्या माध्यमातून जवळ आले असले तरी माणूस माणसापासून दुरावत आहे. मकरसंक्रांतीच्या सणातून महिला भगिनी एकत्रित येत एका चांगल्या विचाराची देवाण घेवाण करून एकमेकांविषयीची आपुलकी निर्माण होते. पारंपारिक सणांना आधुनिकतेची झालर चढली असली तरी अजूनही स्रीयांनी अनेक पारंपारिक सणांचे महत्व कायम ठेवले आहे. हळदी कुंकवाच्या निमित्ताने महिला ताणतणावातून मुक्तता मिळत आहे. काळानुरूप वाणांच्या वस्तू बदलल्या असल्या तरी भारतीय सण आणि निसर्ग यांचे नाते दृढ करत पर्यावरणपूरक वस्तू वाण म्हणून देणे पर्यावरणाप्रती आपली बांधिलकी वाढविण्याचे काम करते असे प्रतिपादन मैत्रेयी ग्रुपच्या अध्यक्षा कविता अभय आव्हाड यांनी केले. 

 

पाथर्डी शहरातील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात मैत्रेयी ग्रुप आयोजित हळदी कुंकू,सत्कार व सामाजिक उपक्रम कार्यक्रमात आव्हाड बोलत होत्या.यावेळी दिपाली बंग, रुपाली काकडे, लता सबलस, माधुरी पैठणकर, मीना मरळीकर, मनीषा सबलस, नंदा आव्हाड, प्रणिता नरवणे, रीना टेके, विजया डोईफोडे, उषा भालेराव, विजया डाके, स्नेहा लाड आदी उपस्थित होत्या.

 

 यावेळी सर्व महिलांना वाण म्हणून पर्यावरणपुरक व आयुर्वेदिक महत्व असलेली तुळस वनस्पती देण्यात आली. सामाजिक कार्य करणाऱ्या माधुरी पैठणकर व मीना मरळीकर यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. महाविद्यालयाच्या विविध क्रीडा प्रकारात पदके मिळविलेल्या योगिता खेडकर, सृष्टी गर्जे, कोमल वाकडे, सुवर्णा राठोड, निकिता क्षीरसागर, श्रुती खेडकर, अमृता खाटिक, ट्रेकर अर्चना गडधे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शहरातील मथाबाई काळोखे या निराधार महिलेला अभय आव्हाड प्रतिष्ठानमार्फत घरासाठी निवारा म्हणून लोखंडी पत्रे व इतर साहित्य देण्यात आले. प्रास्ताविक रेश्मा सातपुते, सुत्रसंचालन अनुजा कुलकर्णी तर आभार प्रणिता भावसार यांनी मानले. कार्यक्रमात बालगायक राजरत्न डोळस याने प्रार्थना गायली.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या