*अहमदनगर जिल्हा ठरतोय
करोनाचा हॉटस्पॉट
*नाशिक जिल्ह्यातही वाढतेय
रुग्णसंख्या
*नाशिक जिल्हा प्रशासनानं घेतला मोठा निर्णय
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नाशिकः नगर जिल्हा करोना संसर्गाचा
हॉट स्पॉट ठरू लागल्याने या जिल्ह्यातून नाशिकमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक
नागरिकाचे थर्मल स्कॅनिंग करा असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी जिल्हा
प्रशासनाला दिले. जिल्हा बॉर्डरवर चेक पोस्ट उभारण्यात येणार असून काही
नागरिकांच्या रॅन्डमली रॅपिड अॅंटीजेन टेस्ट करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
यासंर्भात भुजबळ म्हणाले, ‘ कोरोना बाधितांची रुग्णसंख्या कमी होत
असली तरी कोरोनाच्या कुठल्याही व्हेरियंटचा सामना करण्यासाठी लसीकरण हाच शाश्वत
पर्याय आहे. त्यासाठी लसीकरणावर भर देवून लसीकरणाची गती वाढविण्यात यावी.
जिल्ह्यात डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले तरी त्यातील अनेक रुग्ण आता बरे
झाले आहेत. परंतू करोनाशी संबंधित विषाणूंचा प्रसार होऊ नये यासाठी वेळीच नियंत्रण
आणने आवश्यक असल्याने बाहेरून येणाऱ्या नागरिकांची रँडम तपासणी करून कॉन्टॅक्ट
ट्रेसिंगवर भर देण्यात यावा. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची देखील डेल्टा
तपासणी करण्यात येवून संबंधित रुग्णांवर वेळेत आवश्यक उपचार करावेत. करोनाची भिती
पूर्णत: संपलेली नसल्याने नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून लसीकरण
करून घ्यावे, असे आवाहनही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
करोनाची
तिसरी लाट नाशिकच्या दारापर्यंत येऊन ठेपली आहे. त्यादृष्टीने नाशिक
जिल्ह्याधिकाऱ्यांनी नगर जिल्ह्यातून येणाऱ्यांसाठी थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक
केलं आहे. तसंच, नाशिक जिल्ह्यात आटोक्यात आलेली रुग्णसंख्या पुन्हा वाढल्यानं हा निर्णय
घेण्यात आला आहे. अहमदनगरमधून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार
आहे. करोनाला अटकाव करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सिन्नरमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामागे अहमदनगर कनेक्शन कारणीभूत ठरत असल्याचा दावा आरोग्य यंत्रणेने केला आहे. सिन्नर तालुक्यातील रहिवाशांचे बहुतांश व्यवहार संगमेनरमध्ये चालतात. वावी आणि शहा येथील रहिवाशांचे देखील शिर्डी, कोपरगाव, लोणी या भागात कामानिमित्त येणे जाणे असते. त्यामुळं नाशिक जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.
जिल्हा पुन्हा रुग्णवाढीकडे
नाशिक जिल्ह्यात ३१ जुलैनंतर शुक्रवारी
पहिल्यांदाच १०० हून अधिक जण करोना बाधित आढळले. दिवसभरात ११६ रुग्णांना
करोनासंसर्गाचे निदान झाले असून यापैकी ७९ जण ग्रामीण भागातील आहेत. निर्बंध
शिथिलतेनंतर रुग्णसंख्या वाढत जाणे ही धोक्याची घंटा मानली जात आहे. दिवसभरात ९९
रुग्ण उपचारांद्वारे करोनामुक्त झाले आहेत.
0 टिप्पण्या