लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नवी दिल्ली: मुंबई पोलीस दलाचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात
धाव घेतली आहे. आरोपाप्रकरणी सीबीआयद्वारे चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. पुरावे
नष्ट करण्याआधीच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात खंडणी आणि भ्रष्टाचाराच्या
आरोपांची चौकशीची मागणी परमबीर सिंग यांनी याचिकेत केली आहे. सुप्रीम कोर्टात
परमबीर सिंग यांच्यावतीने मुकुल रोहतगी बाजू मांडणार आहेत.
मुंबई पोलीस दलाच्या आयुक्तपदावरून परमबीर
सिंग यांची उचलबांगडी करण्यात आल्यानंतर त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख
यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आरोप केले. गृहमंत्री अनिल देशमुख
यांनी फेब्रुवारी महिन्यात आपल्या घरी बैठक घेतली. या बैठकीत मुंबई क्राइम
इंटेलिजेंस युनिटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि मुंबई समाजसेवा शाखेचा
सहाय्यक पोलीस आयु्क्त संजय पाटील उपस्थित होते. या बैठकीत देशमुख यांनी वाझे
यांना दर महिन्याला १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल करून देण्याची मागणी केली होती
असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
परमबीर सिंग यांनी गृहमंत्री देशमुख
यांच्यावर बदली करण्यात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप केला. विश्वसनीय सूत्रांनी
दिलेल्या माहितीनुसार, २४-२५
ऑगस्ट २०२० रोजी राज्याच्या गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलीस
महासंचालक आणि महासंचालकांनी गृहमंत्रालयाच्या मुख्य सचिवांना अनिल देशमुख हे बदली
आणि नियुक्तीसाठी भ्रष्टाचार करत असल्याची माहिती दिली होती. ही माहिती
दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेची रेकोर्डिंग करून मिळवण्यात आली होती, असेही याचिकेत नमूद करण्यात आले.
दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या
लेटरबॉम्बनंतर मोठा राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. या लेटरबॉम्बनंतर अडचणीत आलेल्या
महाविकास आघाडी सरकारच्या बचावासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सरसावले आहेत. रविवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतल्यानंतर आज
पु्न्हा शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा बचाव केला आहे. सचिन
वाझे आणि अनिल देशमुख यांच्यात बैठक झाली असल्याचा दावाच चुकीचा असल्याचे पवार
यांनी म्हटले.
0 टिप्पण्या