Ticker

6/Breaking/ticker-posts

राज्यात मुसळधार पावसाचे थैमान; जनजीवन विस्कळीत, कोणत्या जिल्ह्याची काय स्थिती वाचा..

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई: दि. १० जुलै २०२२  

भारतीय हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यातील इतर भागांमध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरुये. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, कोल्हापूर, सांगली आणि विदर्भातही पावसाने थैमान घातलं आहे. पश्चिम, मध्य महाराष्ट्रासह मरठ्वाड्यात देखील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थितीत निर्माण झाली आहे.

 या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पडून लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ६७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पूरस्थिती हाताळण्यासाठी राज्यात १५ एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यातील १० जिल्ह्याना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

 १. पालघर
गेल्या २४ तासात सरासरी १९.९ मिमी. पाऊस झाला असून सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यातील परिस्थिती सामान्य आहे. जिल्ह्यातील ३ मुख्य नद्या इशारा पातळी पेक्षा खाली वाहत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात NDRF चे एक पथक तैनात करण्यात आले आहे.

२. ठाणे
गेल्या २४ तासात सरासरी १७.२ मिमी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. जिल्हात सर्व प्रकारची वाहतूक सुरुळीत सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात २ NDRF टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

 

३. मुंबई
मुंबईत गेल्या २४ तासात कुलाबा येथे ७.६ मिमी तर सांताक्रूझ येथे ५.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, अद्याप सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत असल्याबाबत बीएमसी नियंत्रण कक्षाने कळविले आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु आहे. मुंबईमध्ये NDRF च्या एकूण ५ टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

४. रायगड
गेल्या २४ तासात सरासरी ४३.३ मिमी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच कुंडलिका नदी इशारा पातळीवर वाहत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील वरड प्रवण व पूर प्रवण भागातील ११६८ कुटुंब म्हणजे एकूण ३६४१ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ११ घरांचे नुकसान झाले आहे तसेच ५ घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात २ NDRF टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

 


५. रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात ४०.२ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी व राजापूर तालुक्यातील कोदवली नदी इशारा पातळी वरून वाहत आहेत. सदर भागातील नागरिकांचे आवश्यकतेनुसार स्थलांतर करण्यात येत असून नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे. तसेच वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट सर्व प्रकार वाहतुकीकरिता ९ जुलैपर्यंत बंद करण्यात आला आहे. वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. दरड प्रवण आणि पूर प्रवण भागातील २८८ कुटुंब म्हणजे एकूण ९६५ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. आता पर्यंत जिल्ह्यात १२० घरांचे अंशतः नुकसान झाले आहे तसेच ६ घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात २ NDRF टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

६. सिंधुदुर्ग

गेल्या २४ तासात ११०.४ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरुळीत सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात १ NDRF टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

 

७. पुणे
पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातील परिस्थिती सामान्य असून जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत असून सर्व प्रकारची वाहतूक सुरुळीत सुरु आहे. कोल्हापूर - जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ३१.९ मिमी. पाऊस झाला असून, सद्यस्थिती मध्ये पूर परिस्थिती नाही. पंचगंगा नदीची सध्याची पाणी पातळी ३०.१० फुट असून इशारा पातळी ३९ फुट एवढी आहे. पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता NDRF च्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

 

८. सोलापूर
कर्नाटक राज्यातील विजयापुरा येथे ४.६ रिश्टर स्केल इतका भूकंप झाला असून सोलापूर जिल्यातील मंगळवेढा तालुक्यातील काही गावांना सौम्य धक्के जाणवले आहेत. कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही.

 

९. औरंगाबाद
नांदेड अतिवृष्टी मुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे हदगाव तालुक्यातील बामनी गाव येथील नागरिकांना SDRF पथकाच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात १५० मिमी इतक्या पावसाची नोंद झाली असून वसमत तालुक्यातील तातडगाव येथे २ व्यक्ती शेतात पूराचे पाणी शिरल्याने अडकले आहेत. सदर व्यक्तींच्या बचावकार्यासाठी नांदेड येथील SDRF पथक पाठविले आहे.

 

१०. नागपूर

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली आणि सिरोंचा तालुक्यात मुसळधार पावसामुळे १२८ गावांचा संपर्क तुटला असून एटापल्ली - भामरागड महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील १२० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु असून मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या सातत्याने संपर्कात आहे. पूर परिस्थिती बाबत उपाय योजना म्हणून प्रशासनातर्फे NDRF SDRF यांच्या तुकड्या पूर प्रवण जिल्ह्यांमध्ये या आधीच तैनात केल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या