Ticker

6/Breaking/ticker-posts

आम्हीही यादी देऊ, 'इडी'नं कारवाई करावी; जयंत पाटलांचे थेट आव्हान

 




लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगरः 'महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाला बदनाम करण्यासाठी इडी, सीबीआय व आयटी यंत्रणांना हाताशी धरून भाजप कारवाई करण्यास सांगत आहे. याचवेळी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांच्या गैरकारभाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जात आहे. असं असेल तर आम्हीही अशा नेत्यांच्या आणि त्यांच्या गुन्ह्यांची माहिती देऊ, त्यांच्यावर या यंत्रणांनी कारवाई करून दाखवावी,' असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांनी दिलं.

मंत्री जयंत पाटील दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी नगरला आले आहेत. सकाळी जलसंपदा विभागाची आढावा बैठक घेतली. त्यानंतर पक्षाच्या परिवार संवाद यात्रेचा भाग म्हणून जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका ते घेत आहेत. या दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी हे वक्तव्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर लावले गेलेले आरोप खोटे असल्याचेही त्यांनी सांगितले.


ते म्हणाले, 'हे सर्व जाणीवपूर्वक सुरू आहे. यासंबंधी एक हिंदी भाषेतील संभाषण असलेली ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. त्या क्लीपमध्ये बोलणाऱ्यांनी राज्यातील मंत्रिमंडळ अस्थिर करण्यासाठी डाव आखल्याचं स्पष्ट होतं. तेव्हापासून हे प्रकार वाढले आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना तसेच भाजप सोडून गेलेल्या नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं उदाहरण घेतलं तर ज्या भोसरीतील जागेसंबंधी आरोप आहे. त्या जागेची खरेदी त्यांच्या जावयाकडून रितसर झाल्याचं दिसून येत आहे. जी जागा एमआयडीसीने ताब्यातच घेतली नव्हती. ती मूळ मालकानं खडसे यांच्या जावयाला विकली आहे. त्यांनीही बँकेचे कर्ज काढून ती घेतली. कर्जाची परतफेडही हप्ताने केली आहे. त्यामुळं येथे काळ्या पैशाचा संबंध येतोच कुठं, असं असूनही खडसे यांच्यावर त्यासंबंधीचे आरोप करण्यात येत आहेत, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

'मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बाबतीतही असंच झालं आहे. ज्या कारखान्यासंबंधी आरोप होत आहे, तो शेतकऱ्यांच्या पैशातून उभारण्यात आला आहे. एकदा मी त्या कारखान्यावर गेलो होतो. त्यावेळी तेथील शेतकऱ्यांनी मला कसे पैसे उभारले याची माहिती दिली होती. तरीही मुश्रीफ यांच्यावर ओढून ताणून आरोप लावण्यात येत आहे. माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या बाबतीतही तेच झालं आहे. दुसऱ्या कोणाच्या तरी संभषणातील उल्लेखावरून देशमुख यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. असे आरोप होत असले तरी आम्ही डगमगणार नाही. त्यावेळी केवळ कोर्टाचा आदेश आणि नैतिक जबाबदारी म्हणून देशमुख यांनी स्वत: राजीनाम्याची भूमिका घेतली. पक्ष मात्र या प्रकारांनी डगमगणार नाही. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना या सर्व यंत्रणांच्या कारवाईची माहिती आधीच कशी मिळते? हेच संशयास्पद आहे,' असंही पाटील म्हणाले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या