Ticker

6/Breaking/ticker-posts

जुलै २०२१ ठरला जगाच्या इतिहासातील सर्वाधिक उष्ण महिना !

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

वॉशिंग्टन : या वर्षातील जुलै महिन्याची एका वेगळ्याच कारणाने नोंद घेण्यात आली आहे. जुलै २०२१ हा महिना आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक उष्ण महिना ठरला आहे. अमेरिकेतील National Oceanic and Atmospheric Administration (NOAA) आणि National Centers for Environmental Information (NCEI) ने नवीन माहिती जारी केली आहे. जुलै महिना हा साधारणपणे उष्ण महिना असतो. NCEI  नुसार वर्ष २०२१ हे इतिहासातील सर्वाधिक उष्ण वर्षांपैकी एक वर्ष असू शकते.

जुलै महिन्यात सर्वाधिक तापमान

NOAA  चे रिक स्पिनार्ड यांनी सांगितले की, या माहितीमुळे हवामान बदलाचे घातक परिणाम दिसत आहे. जगावर हवामान बदलामुळे मोठे संकट ओढावले आहे. ताज्या माहितीनुसार, जुलै महिन्यात जमीन आणि महासागराच्या पृ्ष्ठभागावरील एकूण तापमान २० व्या शतकाच्या सरासरी (१५.८ अंश सेल्सिअस) पेक्षा ०.९३ अंश सेल्सिअस अधिक होते. तापमानाची नोंद ठेवण्याचे काम १४२ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. त्यानुसार यंदाच्या जुलै महिन्यात अधिक तापमानाची नोंद करण्यात आली. तर, वर्ष २०१६, २०१९ आणि २०२० मध्ये ०.२ अंश सेल्सिअस अधिक तापमान होते.

जागतीक स्थिती ?

आशिया खंडात जुलै महिन्यात अधिक उष्ण महिना होता. युरोपमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या तापमानाची नोंद करण्यात आली. तर, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि ओशियान भागांमध्ये जुलै २०२१ चे तापमान सर्वाधिक उष्ण तापमानाच्या टॉप १० यादीत आहे. NOAA  ने म्हटले की, समोर आलेली माहिती ही मागील आठवड्यात प्रकाशित झालेल्या IPCC (Intergovernmental Panel on Climate Change) अहवालाने दिलेल्या धोक्याकडे लक्ष वेधतात.

परिणाम

NOAA  च्या अहवालात बर्फाच्छिद प्रदेशांचीही नोंद घेण्यात आली आहे. नॅशनल स्नो अॅण्ड आइस डेटा सेंटरच्या माहितीनुसार, ४३ वर्षात आर्कटिक समुद्रात या वर्षी चौथ्यांदा बर्फाचे प्रमाण कमी होते. याआधी, जुलै २०१२, २०१९ आणि २०२० या वर्षांत समुद्रात बर्फाचे कमी प्रमाण होते. तर, अंटार्कटिकमध्ये बर्फ सरासरी प्रमाणापेक्षा अधिक होता.

 

IPCC अहवाल

हवामान बदल आणि अमेरिकेसह जगभरात अनेक देशांमधील जंगलांमध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना चिंतेत आणखी भर टाकणारा अहवाल समोर आला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेंटचेजने (IPCC) अहवाल प्रकाशित केला आहे. हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी केले नाही तर सन २१०० पर्यंत पृथ्वीचे तापमान दोन अंशांनी वाढू शकते. समुद्राची पातळीदेखील वाढणार असल्याचा इशारा या अहवालात देण्यात आला आहे. हवामानातील अनेक बदल धक्कादायक असून अशाप्रकारचे बदल पाहिले गेले नव्हते. हवामान बदलाचे परिणाम दिसू लागले आहेत. समुद्राच्या पातळीत होणारी वाढ याच बदलामुळे होत असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले. हवामान बदलांमुळे जाणवणारे परिणाम अनेक वर्षापर्यंत संपुष्टात येऊ शकत नाही, असा इशारा IPCC च्या अहवालात देण्यात आला आहे.

भारताला काय धोका ?

भारतावरही मागील काही वर्षांपासून हवामान बदलाचे परिणाम दिसू लागले आहेत. चक्री वादळ, पूर येणे, मुसळधार पाऊस आदी संकटे भारतावर आली आहेत. COP26  चे अध्यक्ष आलोक शर्मा यांनी म्हटले की, हवामान बदलाचा प्रभाव जगभरात दिसून येत आहे. आताच उपाययोजना न आखल्यास त्याचे परिणाम दिसून येतील. तज्ञांच्या मते, पृ्थ्वीच्या तापमानात १.५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाल्यास भारताच्या मैदानी प्रदेशातील उष्णता प्राणघातक ठरू शकते. आगामी १० वर्षात उष्माघाताचा सामना करण्यासाठी भारताने सज्ज व्हावे असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. याआधी करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, हवामान बदलामुळे समुद्राची पातळी ५० सेमीपर्यंत वाढली तरी भारतातील सहा बंदर असलेली शहरे, चेन्नई, कोची, कोलकाता, मुंबई, सुरत आणि विशाखापट्टणममधील कोट्यवधी नागरिकांना पुराचा फटका बसू शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या