Ticker

6/Breaking/ticker-posts

नगर जिल्ह्यात रेमडीसीविरचा काळाबाजार होणार नाही - राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

 



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर: कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन मध्ये निर्बंधाची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच आरोग्य विषयक बाबींकडे अधिक लक्ष दिले जात आहे. जिल्ह्यात रेमडीसीविर इंजेक्शनचा काळा बाजार होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल, असे प्रतिपादन नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.

आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर श्री. तनपुरे यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांच्यासह विविध प्रशासकीय विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

श्री. तनपुरे म्हणाले, रेमिडीसिविर इंजेक्शनचा मर्यादित येणारा साठा वितरीत करण्यात जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियमांची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे. रुग्णांच्या अथवा त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारी येणार नाहीत, याकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली. हॉस्पिटलने वापरलेल्या रिकाम्या व्हायल जपून ठेवून त्याचा हिशोब महानगरपालिका आयुक्तांनी घेऊन इंजेक्शनचा काळा बाजार होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यादृष्टीने रुग्णालयांना निर्देश द्यावेत, अशी  सुचनाही त्यांनी केल्या.

या बैठकीदरम्यान इंडीयन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने राज्यमंत्री श्री. तनपूरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी विविध समस्या मांडल्या. हॉस्पिटलमध्ये लावण्यात येणाऱ्या ऑक्झिजन प्लांट संदर्भात नगरविकास विभागाद्वारे  शिथिलता आणण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली. निवेदनानुसार मंत्रालय मुंबई येथे नगरविकास विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांबरोबर बैठक लावण्याचे डॉक्टरांना आश्वस्त केले.

तसेच अहमनगर जिल्ह्याला मिळणाऱ्या ऑक्सिजन पुरवठयासंदर्भात सुसूत्रता यावी या डॉक्टरांच्या सूचना अमलात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या