लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर भाजपने टीकास्त्र
सोडल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला
आहे. मुख्यमंत्र्यांचा आम्हाला अभिमान असून चक्रीवादळाला लाजवेल असाच
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा वेग होता, असे
म्हणत मुख्यमंत्र्यांचा बेस्ट मुख्यमंत्री असा उपरोधिक टोला मनसेने लगावला आहे.
मनसेचे नेते संदीप
देशपांडे यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांच्या चक्रीवादळानंतरच्या कोकण दौऱ्यावर
टीकास्त्र सोडले आहे. संदीप देशपांडे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे, चक्री वादळाला लाजवेल असा तुमच्या दौऱ्याचा वेग
होता. पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात. खरच BEST C M.'
संदीप देशपांडे
यांनी काल देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्र्यांवर टिप्पणी केली
होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातच्या पुढे दिसत नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबई
महापालिकेच्या पुढे दिसत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेला दोघांमध्ये भविष्य दिसत
नाही, असं भाष्य देशपांडे यांनी करत पंतप्रधान मोदी आणि
मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.
मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आमदार
नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडले होते. कोकणाने शिवसेनेला नेहमीच भरभरुन दिले
आहे. मात्र आता देण्याची वेळ आली तेव्हा हात आखडता घेतला जात आहे, अशी खरमरीत टीका फडणवीस यांनी केली. त्यानंतर
चंद्रकांत पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. सरकार आल्यापासून
उद्धव ठाकरेंचे पाय हवेत गेले होते. पण आता ते बाहेर पडले आहेत. ते आता जमिनीवर
आले आहेत मला याचा आनंद आहे असे पाटील यांनी म्हटले होते.
0 टिप्पण्या