Ticker

6/Breaking/ticker-posts

म्युकरमायकोसिस आजार संसर्गजन्य आहे की नाही?; टोपे यांनी दिली महत्त्वाची माहिती

 









लोकनेता न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

जालना: ' म्युकरमायकोसिस 'वर संपूर्ण राज्यातील शासकीय रुग्णालयात तसेच महात्मा फुले जयआरोग्य योजना  संलग्न असलेल्या रुग्णालयात संपूर्ण मोफत औषधोपचार आणि अकरा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या उपचारासाठी दीड लाख रुपये खर्चाच्या मर्यादेत सरकारच्या वतीने विशेष बाब म्हणून वाढ केली आहे, याचे शासकीय आदेश देण्यात आले आहेत. तसेच, म्युकरमायकोसिस होऊ नये म्हणून सरकारच्या वतीने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे दिली. म्युकरमायकोसिस हा आजार संसर्गजन्य आहे की नाही, यावरून निर्माण झालेल्या संभ्रमावरही टोपे यांनी यावेळी महत्त्वाची माहिती दिली.

 

राजेश टोपे यांनी या आजाराविषयीच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखर नियंत्रण अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि प्रतिकारशक्ती कमी करणाऱ्या औषधाचा वापर करताना विशेष काळजी घेण्याच्या सूचना टास्क फोर्सने दिल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

आजार संसर्गजन्य की नाही?

म्युकरमायकोसिस संदर्भात राज्यातील टास्क फोर्सच्या बैठकीत अध्यक्ष

डॉ. संजय ओक यांनी सांगितल्याप्रमाणे हा आजार संसर्गजन्य रोग नाही. मात्र, केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांमध्ये हा आजार संसर्गजन्य रोग जाहीर करण्याचे सांगितले आहे. मात्र, या संदर्भात पुन्हा एकदा राज्य सरकारच्या वतीने टास्क फोर्सच्या बैठकीत हा मुद्दा ठेवून त्यावर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती टोपे यांनी दिली. करोना प्रतिबंधात्मक लस, रेमडेसिवीर, ऑक्सिजन यांसह अन्य औषधे खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने जागतिक पातळीवर निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या मान्यतेच्या खूप मोठ्या प्रक्रियेच्या अडचणी येत आहेत, हीच आमची हतबलता आहे, असेही टोपे यांनी यावेळी सांगितले.


औषधांमध्ये केंद्रीय नियमांचे अडसर

म्युकरमायकोसिसवरील औषधे व इंजेक्शनच्या खरेदी आणि पुरवठ्यावर केंद्र सरकारचे संपूर्ण नियंत्रण आहे. या औषधांच्या खरेदीसाठी राज्य सरकारने तातडीने संबंधित औषध कंपन्यांना ऑर्डर दिलेल्या आहेत. मात्र, केंद्र सरकारकडून जोपर्यंत याच्या पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना कोणत्या राज्यात किती औषधे द्यावी, याचे अलॉटमेंट दिले जात नाही, तोपर्यंत ही औषधे राज्यात उपलब्ध होऊ शकत नाहीत, असे त्यांनी सांगितले. एम्फोटेरेसीन बी हे लिम्फोस फॉर्ममध्ये तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय मंत्री मनसूख मांडवीय यांच्याकडे आपण सातत्याने पाठपुरावा करत आहोत. ही इंजेक्शन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना तातडीने उत्पादन वाढवण्यासाठीचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी आपण केली असल्याचे टोपे यांनी सांगितले.

मुंबईत मृत्यूदर जास्त

मुंबई शहरातील ५० वर्षांवरील रुग्णांचा मृत्यूदर तुलनात्मक वाढ झाली आहे. त्यात लसीकरणाचे कमी प्रमाणे हेसुद्धा महत्त्वाचे कारण आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले. लस ही कवच आहे आणि नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण झाले पाहिजे यासाठी मुंबई महापालिका प्रयत्न करत आहे, असे टोपे म्हणाले. ५० वर्षांवरील ज्या नागरिकांना मधुमेह, ब्लड प्रेशर यासारख्या सहव्याधी आहेत त्यांना जास्त धोका संभवतो, असेही त्यांनी सांगितले.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या