लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई: महाराष्ट्राला इतिहास संघर्षाचा आहे. महाराष्ट्राला सहजासहजी काहीही मिळालेलं नाही. महाराष्ट्राने प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष केला आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापनाही संघर्षातून, हुतात्म्यांच्या बलिदानातून झाली आहे. सीमाभागातील मराठी गावांना महाराष्ट्रात आणण्यासाठी तसेच करोनाच्या महाभीषण संकटावर विजय मिळवण्यासाठी महाराष्ट्राचा संघर्ष आजही सुरू आहे. महाराष्ट्रातील जनतेची एकजूट, निर्धाराच्या बळावर महाराष्ट्र ही दोन्ही उद्दीष्टे साध्य करील, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सहभागी
महाराष्ट्रवीरांच्या त्यागाचे स्मरण करून अजित पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली
तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील शहीद वीरांना आदरांजली वाहिली आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी पाहिलेले बेळगाव, कारवार,
निपाणी, बिदर, भालकीसह
सीमाभागातील समस्त मराठी गावे महाराष्ट्रात सामील करण्याचे स्वप्न अद्याप अपूर्ण
असून सीमाभागातील शेवटचे मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत आपला लढा सुरुच राहील,
याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
राज्यावरील करोना संकटाविरुद्ध
महाराष्ट्र एकजूटीने, निर्धाराने लढत आहे. राज्यातील डॉक्टर,
नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस, अंगणवाडी
सेविका, आशाताई, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज संस्थांचे
अधिकारी-कर्मचारी, राज्यभरातले लोकप्रतिनिधी, नागरिक सर्वजण जीवाची जोखीम पत्करुन करोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान देत
आहेत. या सर्व करोना योद्ध्यांच्या सेवाकार्याची नोंद इतिहासात होईल, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
करोनाच्या संकटकाळात राज्य शासनाचे
सर्वोच्च प्राधान्य नागरिकांचे जीव वाचवण्याला आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी
शासनाने नाईलाजाने राज्यात निर्बंध लागू केले आहेत. प्रसंगी वित्तीय हानी झाली तरी
चालेल, मात्र मनुष्यहानी
टाळली पाहिजे, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
राज्याची आरोग्य यंत्रणा भक्कम करण्यात येत आहे. समस्त महाराष्ट्रवासियांची एकजूट,
निर्धार, संयमाच्या बळावर महाराष्ट्र लवकरच
करोनावर मात करेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी व्यक्त केला असून करोनोविरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येकाने योगदान
द्यावे. मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हात वारंवार धुणे आदी नियमांचे पालन करून स्वत:ला आणि कुटुंबाला सुरक्षित
ठेवण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
0 टिप्पण्या