Ticker

6/Breaking/ticker-posts

कोरोना पार्श्वभूमी : श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांची यात्रा रद्द

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मढी :-होळीपासून गुढीपाडव्या पर्यंत चालणारी श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथाची यात्रा कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली असून प्रथा परंपरा पाळत देवस्थान समितीकडून यात्रा कालावधीत अत्यावश्यक विधी होतील. राज्यातून येणाऱ्या हजारो काठ्यांना गावात प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील अशी माहिती तहसीलदार श्याम वाडकर यांनी दिली.
  

श्री क्षेत्र मढी देवस्थान समितीच्या सभागृहात यात्रा नियोजन बैठकीत चे आयोजन प्रांताधिकारी देवदत्त केकान यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी शितल खिंडे,पोलीस निरीक्षक रणजित डेरे, आगार प्रमुख महेश कासार याशिवाय सार्वजनिक आरोग्य, दारूबंदी व उत्पादन शुल्क,बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग, नगरपालिका,ग्रामपंचात, विज वितरण कंपनी, वनविभाग आदी विभागाचे प्रतिनिधी, देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकडकोषाध्यक्ष बबन मरकड,सचीव विमल मरकड, उपसरपंच रवींद्र आरोळे, विश्वस्त अर्जुन शिरसाट, अँड. शिवजीत डोके,डॉ. विलास मढीकर,शामराव मरकड,भाऊसाहेब मरकड , तानाजी ढसाळ,ग्रामस्थ नवनाथ मरकड , पोपट शेख , ग्रामपंचायत सदस्य पोपट घोरपडे , चंद्रभान पाखरे , गणेश मरकड ,आदींसह ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी उपस्थित राहून यात्रेचा आढावा घेतला.

    यावेळी बोलताना वाडकर म्हणाले, राज्यातील भटक्या समाजाची पंढरीची यात्रा म्हणून याकडे पाहिले जाते.अठरापगड जातीचे बांधव यात्रेसाठी येऊन येथे परंपरेप्रमाणे धार्मिक विधी करतात.गावाची सार्वजनीक होळी पेटविण्याचा मान गोपाळ समाजाला असून या दिवशी गोपाळ समाजातील मानकरी, निवडक विश्वस्त,पुजारी आदींच्या उपस्थित होळी पेटविली जाईल.अन्य भाविकांना गावात प्रवेश मिळणार नाही. मढीला येणाऱ्या सर्व बाजूंच्या रस्त्यावर गावाच्या हद्दीवर पोलीस व देवस्थान समितीतर्फे बँरीकेटींग करून यात्रेकरुणां गावात प्रवेश मिळणार नाही. यात्रेनिमित्त सर्व व्यवसाय,धार्मिक, सामाजिक,सांस्कृतिक व अन्य कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे.

 गर्दीच्या दिवशी म्हणजे चतुर्थी,रंगपंचमी व षष्ठीच्या दिवशी संचार बंदी आदेश जारी करायचा, यात्रा पूर्ण बंद करायची,की देवाच्या काठ्या बरोबर पाच व्यक्तींना प्रवेश द्यायचा याचा निर्णय १५ तारखेनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला जाईल. त्यांच्याकडून मिळणाऱ्या आदेशानुसार यात्रेच्या पुढचा टप्प्या विषयी निर्णय घेतला जाईल. देवस्थान समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांची यात्रेपूर्वी कोरोना चाचणी केली जाईल.दरवर्षी एस.टी.कडून यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या जादा गाड्या यावर्षी सोडण्यात येणार नाहीत. कोणीही भाविकांनी यात्रेसाठी येऊ नये. यात्रेपूर्वी गावात आरोग्य विभागामार्फत धुरळणी,फवारणी व गावातील पाणवठ्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. मास्क ची तपासणी,सामाजिक आंतर पडताळणी पथक कार्यरत करण्यात येऊन यात्रा बंद असल्याबाबत ची माहिती सर्वत्र फलक लावून देवस्थान समितीने जाहीर करावी. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांना विविध माध्यमातून संदेश पोहोच करावा. संसर्गापासून ग्रामस्थांसह तालुक्याचे रक्षण व्हावे यासाठी यात्राकाळात सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.मढी ग्रामपंचायतीने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आवश्यक उपाययोजनांसाठी पुढाकार घ्यावा,असे वाडकर म्हणाले.  
यावेळी पोलीस निरीक्षक रणजित डेरे, प्रांताधिकारी केकान यांनीही मार्गदर्शन केले. देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड यांनी स्वागत तर मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार यांनी आभार मानले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या