शिवसेना (शिंदे) तिसरी यादी जाहीर
संगमनेर-अमोल खताळ,श्रीरामपूर- भाऊसाहेब कांबळे, तर नेवासेतून विठ्ठल लंघे यांना उमेदवारी जाहीर
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
आहिल्यानगर: उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या 24 तास आधी महायुतीच्या जागा वाटपात बराच गोंधळ झाल्याचे उघडकीस आले. यामध्ये संगमनेर मतदार संघातून डॉ. सुजय विखे इच्छुक असताना महायुतीतल्या गोंधळामुळे त्यांच्या नावावर शिक्कामार्फत होऊ शकले नाही. मात्र त्याचवेळी नेवाशातील जागेवर भाजपचे विठ्ठल लंघे यांना शिंदे शिवसेनेने उमेदवारी दिली? तर श्रीरामपूरमधून माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
प्रारंभी पासूनच संगमनेर मधून लढण्याचा इरादा डॉ. सुजय विखे यांनी बोलून दाखविला, त्यानुसार थेट मतदारसंघात सभांचा धडाका लावला. अखेर ही जागा शिंदे गटाकडे गेली. की दिली? येथुन जे अमोल खताळ उमेदवार दिले, तेही भाजपचे कार्यकर्ते आहेत. तसेच नेवासे येथून उमेदवारी दिलेले विठ्ठल लंघे हेही भाजपचे मग सुजय विखे सुद्धा चालले असते. परंतु बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात मुख्यमंत्री शिंदे यांनी
विखेंना उमेदवारी का दिली नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. नेमकी कुठे माशी शिंकली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. थोरात हे वजनदार नेते आहेत. वरीष्ठ पातळीवर पडद्याआडचे राजकारण शिजले. आणि बाळासाहेब थोरात यांनी विखे यांच्या आक्रमक पावित्र्याला लगाम घातल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 24 तास शिल्लक राहिले आहे .अशा प्रसंगी राज्यभरातील महाआघाडी आणि महायुतीतील उर्वरित उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध करण्याची कसरत पक्षश्रेष्ठींना सध्या करावी लागत आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केल्यास महाविकास आघाडीने आपले सर्वच्या सर्व 12 उमेदवार जाहीर केले आहेत. त्याच वेळी महायुतीला मात्र अवघ्या 9 उमेदवारांवर शिक्कामोर्तब करता आले होते. शेवटचा दिवस बाकी असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले उमेदवार उभे केले.
संगमनेरमध्ये त्यांनी अमोल खताळ तर नेवासेतून विठ्ठल लंघे यांना उमेदवारी दिली. दोनच दिवसापूर्वी संगमनेर मतदार संघात जो काही राडा झाला त्यावर खल सुरू असताना आमदार बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे वजन वापरून डॉ. विखेंना कात्रजचा घाट दाखविला, असे बोलले जाते. आमदार थोरात व मुख्यमंत्री शिंदे यांचे संबंध अनेक वर्षापासूनचे निकटचे आहेत.
तथापि राजकारणामध्ये ते कुठे कधी आणि कसे वापरायचे हे त्यांनाच माहिती. त्यामुळे या सगळ्या राजकीय समीकरणात विखे पाटलांना धोबीपछाड मिळाला आहे. विखे पाटील जड व्हायला नकोत.. हाच त्यामागचा होरा आहे हे लपून राहिलेले नाही. एकूणच जागा वाटपाच्या अंतिम टप्प्यात सारे काही आलबेल नाही, हेच सिद्ध झाले आहे. आता डॉ. सुजय यांना खताळ यांचा प्रचार करावा लागेल.
0 टिप्पण्या