लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ६० वर्षांवरील जेष्ठ नागरीकांसाठी सुरु केलेल्या वयोश्री योजनेतील सुमारे ३७ हजार ४०१ पात्र लाभार्थ्यांना साधन साहित्यांचे प्रातिनिधीक स्वरुपात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ.विरेंद्र कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरण करण्यात येणार असल्याची माहीती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.
केंद्र सरकारने सामाजिक न्याय व आधिकारीता मंत्रालयाच्या माध्यमातून राष्ट्रीय वयोश्री योजना सुरु केली. ६० वर्षांवरील जेष्ठ नागरीकांना व्हील चेअर, कमोड, श्रवणयंत्र, मानेचा, पाठीचा पट्टा, कृत्रिम दात, चष्मा इ.साहित्य मोफत देण्याची तरतुद या योजनेत करण्यात आली आहे. या योजनेची यशस्वी अंमलबजावणी नगर जिल्ह्यात माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने तालुका स्तरावर शिबीराला मिळालेल्या यशस्वी प्रतिसादामुळे देशपातळीवर या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणारा नगर जिल्हा हा महाराष्ट्रात एकमेव ठरला आहे.
या योजनेचा लाभ नगर जिल्ह्यातील सर्व जेष्ठ नागरीकांना घेता यावा यासाठी डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलीत दिव्यांग पुर्नवसन केंद्र व समाज कल्याण विभाग यांच्या माध्यमातून २१ शिबीरांचे आयोजन जिल्ह्यातील सर्वच तालुका स्तरावर दिनांक १ ऑक्टोंबर ते १ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत करण्यात आले होते. या शिबीराच्या माध्यमातून जेष्ठ नागरीकांना मागणी प्रमाणे साधन साहित्याची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करुन घेण्यात आली. जिल्ह्यातील सुमारे ३७ हजार ४०१ नागरीक या योजनेसाठी पात्र ठरल्याने त्यांना मंजुर झालेले साधन साहित्य वितरीत करण्यात येणार असल्याचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
सोमवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११ वा. या साधन साहित्य वाटपाचा शुभारंभ नगर येथील केडगाव येथील निशा लॉन्स येथे प्रातिनिधीक स्वरुपात साधन साहित्य वाटपाचा शुभारंभ केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ.विरेंद्र कुमार यांच्या उपस्थितीत आयोजीत करण्यात आला असून, जिल्ह्यातील उर्वरित लाभार्थ्यांना तालुका स्तरावर आयोजित करण्यात येणा-या कार्यक्रमांमधुन या साधन साहित्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
0 टिप्पण्या