Ticker

6/Breaking/ticker-posts

काँग्रेस जिल्हाध्यक्षाच्या समर्थनार्थ शिवसेना -भाजप मैदानात; राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर : एमआयडीसीमधील आयटी पार्कची पाहणी करण्यासाठी गेलेले काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा दाखल झालेला गुन्हा खोटा असून लोकप्रतिनिधीने दबाव टाकून हा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. यासाठी पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत भाजपचेही काही पदाधिकारी उपस्थित होते. काळे यांची पाठराखण करण्याच्या निमित्ताने शहरातील राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याविरोधात हे सर्वजण उघडपणे एकवटल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळत आहे.

दोन दिवसांपासून आयटी पार्कच्या निमित्ताने जगताप आणि काळे यांच्यात जाहीर वाद झाला. दोघांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. त्यातच काळे यांच्याविरोधात आयटी पार्कमधील एका महिलेने फिर्याद दिल्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. जगताप यांच्यावर आरोप करताना काळे सतत शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांच्याकडून प्रेरणा मिळत असल्याचे सांगतात. याचाच आधार घेत शिवसेनेचे पदाधिकारी आज जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना भेटायला गेले होते.

'नगर शहरात स्थानिक लोकप्रतिनिधी राजकीय दबावाचा वापर करतात व निष्पाप लोकांवर खोटे गुन्हे दाखल करतात. अशाच प्रकारे काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यावरही आयटी पार्क पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात तक्रारदार महिलेचा बोलावता धनी कोण आहे हे सर्वांना ठावूक आहे. एमआयडीसी पोलिसांनी कोणाच्या दबावाला बळी पडून हा खोटा गुन्हा किरण काळे यांच्यावर दाखल केला आहे,' असा सवाल यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला.

शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. यावेळी अनेक मुद्दे उपस्थित केले. नगर शहरामध्ये शहराच्या लोकप्रतिनिधींच्या वतीने वारंवार विविध शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. मागील अनेक वर्षांपासून अशा प्रकारे पोलीस यंत्रणेवर दबाव आणत हे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत, असा आरोपही यावेळी करण्यात आला.

' पोलिसांनी पडताळणी करून मगच त्या आधारे पुढील कारवाई करायला हवी होती. मात्र शहराच्या आमदारांनी पोलिसांवर दबाव आणला. त्या ठिकाणी आमदारांचे बगलबच्चे हे पोलीस स्टेशनला ठाण मांडून होते. जर घटना आयटी पार्कमधील होती तर आमदारांचे बगलबच्चे त्याठिकाणी दबाव आणण्याचे काम का करत होते,' असा सवाल यावेळी शिवसेना शिष्टमंडळाने उपस्थित केला.

 शहर शिवसेना प्रमुख दिलीप सातपुते, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, भाजपचे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक मदन आढाव, नगरसेवक योगीराज गाडे, माजी विरोधी पक्षनेता दशरथ शिंदे, नगरसेवक संग्राम शेळके, गौरव ढोणे, सागर गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक या वेळी उपस्थित होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या