Ticker

6/Breaking/ticker-posts

बोठे जामिनप्रकरणी मंगळवारी होणार निर्णय; वकिलांनी केला 'हा' युक्तीवाद

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगरः रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठेच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला. यावर न्यायालय मंगळवारी (७ सप्टेंबर) आपला निर्णय देणार आहे. या खटल्यातील सरकारी वकिल अ‍ॅड. उमेशचंद्र यादव यांनी गेल्या आठवड्यातच युक्तिवाद केला होता. शुक्रवारी बोठेचे वकिल अ‍ॅड. महेश तवले यांनी युक्तिवाद केला. जरे यांना मारण्याचा बोठेचा कोणताही उद्देश दिसून येत नाही. पोलिसांनी बोठेविरूद्ध घाईघाईने प्रक्रिया राबविल्याचा आरोपही तवले यांनी केला.

बदनामी होण्याच्या भीतीमुळे बोठेने जरे यांचा सुपारी देऊन खून केल्याचा आरोप आहे. यामध्ये बोठे अटकेत असून आरोपींविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल झालेले आहे. या गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी बोठेतर्फे जिल्हा न्यायालयात गेल्या महिन्यात अर्ज करण्यात आला आहे. यामध्ये सरकारी वकील यादव यांनी पूर्वीच युक्तिवाद केला आहे. आरोपीच्या वकिलांनी यासाठी मुदत मागवून घेतली होती. अखेर आज त्यांनी युक्तिवाद केला. अ‍ॅड. महेश तवले यांनी बाजू मांडताना न्यायालयात सांगितले की, बोठेचा जरे यांना मारण्याचा उद्देश नव्हता. पोलिसांनी कागदपत्रांची जुळवाजुळव करून बोठे याला आरोपी घोषित केले आहे. या खटल्यात पोलिसांनी खूपच घाई केल्याचे दिसून येते. सामान्यपणे गुन्हे दाखल झाल्यावर आरोपीला फरार घोषित करण्याची प्रक्रिया पोलिस एवढ्या जलद गतीने राबवत नाहीत.

 या गुन्ह्यात नात्र पोलिसांनी घाईघाईने न्यायालयात आरोपीला फरार घोषित करण्याची प्रक्रिया राबविली. आरोपी सागर भिंगारदिवे याचे नाव बोठेने हनीट्रॅपसंबंधी चालविलेल्या वृत्तमालिकेत होते. असे असताना बोठे भिंगारदिवेला सुपारी का देईल, असा प्रश्नही वकिलांनी उपस्थित केला. याशिवाय या गुन्ह्यानंतर आलेल्या अनेक तक्रार अर्जांचाही तवले यांनी संदर्भ दिला. या सर्वांवरून बोठेचा जरे यांना मारण्याचा उद्देश नसल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले.

 यापूर्वी युक्तिवाद करताना सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी बोठेला जामीन देण्यास सरकार पक्षातर्फे विरोध केला. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर असून, पोलिसांनी यासंबंधीचे बरेच पुरावे न्यायालयासमोर आणले आहेत. तो जामीनावर सुटल्यास फरार होऊ शकतो. तसेच साक्षीदारांवर दबावही आणू शकतो. बोठे याने रेखा जरेंशी वितुष्ट आल्याने शांत डोक्याने कट रचला. खुनासाठी यातील आरोपी सागर भिंगारदिवे व आदित्य चोळके यांच्यामार्फत पैसे पुरविले आहेत. खुनाच्या घटनेनंतर अटकेच्या भीतीने शंभरपेक्षा जास्त दिवस तेलंगणा राज्यात आश्रय घेतला होता. त्याला कायदेशीर ज्ञान आहे. घटनेअगोदर आणि त्यानंतरचे वर्तन लक्षात घेऊन त्याला जामीन देऊ नये,’ असा युक्तिवाद यादव यांनी केला होता. आता आरोपीचा युक्तिवादही पूर्ण झाला असून न्यायालयाने निकालासाठी ७ सप्टेंबर ही तारीख ठेवली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या