Ticker

6/Breaking/ticker-posts

‘मुख्यमंत्र्याचं काय ? जाऊ दया, मरू दया तिकडं ' पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची जीभ घसरली

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 सोलापूर: 'माझे नेते अजित पवार आहेत. मुख्यमंत्र्याचं काय ? जाऊ दया, मरू दया तिकडं ', असे वक्तव्य करताना सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची एका कार्यक्रमाप्रसंगी भाषणातून महापौर श्रीकांचना यन्नम यांना उद्देशून बोलताना अचानकपणे जीभ घसरली. पालकमंत्री भरणे यांच्या या गावरान भाषेतील वक्तव्याचा विपर्यास झाला आणि बघता बघता हे वक्तव्य प्रचंड व्हायरल झाले.पालकमंत्री भरणे यांच्या गावरान भाषेतील व तमाम शिवसैनिकांना चीड आणणाऱ्या या वक्तव्याचा शहरी भागातील शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी खरपूस समाचार घेतला.

सोलापूरचे संपर्क प्रमुख आमदार तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्यामुळे आपण मंत्री झाला असून टाकून दिलेल्या माणसाला मंत्री केल्याची जाणीव पालकमंत्री भरणे यांनी ठेवावी अशा शब्दात समाचार घेतला. तर शहरप्रमुख गुरुषांत धुत्तरगावकर यांनी पालकमंत्री भरणे यांची जीभ हासडू असा इशारा दिला.शिवसेनेच्या महिला प्रमुख अस्मिता गायकवाड यांनी भरणे यांनी माफी मागावी अशी मागणी केली.तर युवा शिवसैनिक अतुल भंवर यांनी पालकमंत्री भरणे यांना सोलापुरात फिरकू देणार नाही असा इशारा दिला

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत एक लाख वृक्ष लागवड मोहीम मी त्या माध्यमातून प्रभाग क्रमांक पाच मधील देगाव देगाव रोड येथे ४३ एकर जागेवर गटनेता आनंद चंदनशिवे यांचा भांडवली निधीतून वीस हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्र्यांचे भरभरुन कौतुक केले. त्यांना मुख्यमंत्री व्हा, असे म्हणत कौतुक केले,

त्यानंतर पालकमंत्री भरणे यांनी चंदनशिवे दादा मला खूप काही मिळाले आहे. तुम्हाला काय द्यायचं आशीर्वाद तो माझ्या अजितदादांना द्या असे म्हणत महापौरांशी बोलताना थेट मुख्यमंत्री जाऊ द्या,मरु द्या असे वादग्रस्त वक्तव्य केले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या माझी वसुंधरा अभियान कार्यक्रमातच पालकमंत्री भरणे यांनी असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने उपस्थित पत्रकारांसह सर्व प्रशासनातील अधिकारी आवाक झाले.

दरम्यान आपण माध्यमातून टार्गेट होत असल्याचे लक्षात येताच पालकमंत्री भरणे यांनी माध्यमांनी आपल्या वाक्याचा विपर्यास केल्याचे सांगत आपल्या चुकीचे खापर माध्यमांवर फोडले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आपणास खूप आदर आहे.आपल्याला तसे म्हणायचे नव्हते.तर गावरान भाषेतील आपल्या वाक्याचा विपर्यास केल्याचे सांगत आपण दिलगिरी व्यक्त करत असल्याचे त्यांनी सांगितले. तरीसुद्धा सोलापुरात दिवसभर शिवसैनिकांनी सोशल मीडियावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा पिच्छा सोडला नाही.

 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या