Ticker

6/Breaking/ticker-posts

राहुरी सहकारी साखर कारखान्याबाबत खासदार सुजय विखेंनी केला मोठा दावा

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अ.नगर : सहकारी साखर कारखाने आजारी पाडून ते कमी किमतीला विकत घेण्याचे प्रकरण सध्या राज्यात गाजत आहे. सर्वपक्षीय नेते यामध्ये अडकल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर राहुरीचा सहकारी साखर कारखाना चालविण्यासाठी आपण आतापर्यंत घरातून १५ कोटी रुपये खर्च केले आहेत,’ असा दावा नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे.

यापुढेही कारखाना सुरू करण्यास आणखी दहा कोटी रुपयांची व्यवस्था करण्याचीही तयारी आहे. मात्र, सरकारने सध्याच्या संचालक मंडळास एक वर्ष मुदतवाढ द्यावी,’ अशी मागणीही सुजय विखे पाटील यांनी केली आहे.

देशातील पहिला सहकारी साखर कारखाना ज्यांच्या पुढाकारातून सुरू झाला त्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचे खासदार डॉ. सुजय विखे पणतू आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील राहुरी येथील डॉ. बाबूरावदादा तनपुरे सहकारी साखर कारखान्यात लक्ष घातले. कारखान्यावर त्यांच्या अधिपत्याखालील संचालक मंडळही निवडून आले. अनेक वर्षे बंद असलेला हा कारखाना त्यांनी सुरू केला. मात्र, अलीकडेच कारखाना पुन्हा अडचणीत आला आहे. तो सुरू करण्याची चर्चा सुरू असतानाच संचालक मंडळाची मुदत संपली आहे. जिल्हा सहकारी बँकेवरही महाविकास आघाडीच्या नेत्यांचे वर्चस्व असल्याने ही बँकही कारखान्याला मदत करीत नसल्याचा आरोप आहे

या पार्श्वभूमीवर खासदार विखे यांनी पत्रकार परिषदेत कारखाना पुन्हा सुरू करण्याची तयारी असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘या कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत २६ जून २०२१ रोजी संपली आहे. संचालक मंळाला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कारखान्याचा गळीत हंगाम ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होतो. कारखाना सुरू करण्यासाठी किमान दहा कोटी रुपये खर्च येतो. सध्या कोणतीही बँक कारखान्याला एकही रुपयाही कर्ज देत नाही. आतापर्यंत कारखाना सुरू करण्यासाठी मी वैयक्तिकरित्या घरातून १५ कोटी रुपये खर्च केला आहे. प्रत्येकवेळी कारखाना सुरू करण्यासाठी पैसे आणायचे कोठून? कारखाना सुरळीत सुरू करण्यासाठी दहा कोटी रुपये खर्च आहे. समजा तो खर्च पुन्हा मी केला आणि ऐनवेळेस राज्य शासनाने कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती केली तर हे पैसे परत कोण देणार? त्यासाठी राज्य सरकारने कारखाना चालविण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिली तर शेतकरी, कामगारांसाठी हा कारखाना एकाच महिन्यात सुरू करण्यास आपण कटीबद्ध आहोत.'

'...अन्यथा निवडणूकीला सामारे जाऊ'

'कारखान्याच्या सभासदांचे काही देणे बाकी आहे. तेही देता येईल. शेतकर्‍यांकडे कारखान्याची आगाऊ रक्कम मुद्दल व व्याजासह २१ कोटी रुपयांच्या दरम्यान असून या रकमेतून शेतकर्‍यांनी मुद्दल भरली तरी त्यांना व्याज माफ करण्याचा संचालक मंडळाचा निर्णय घेण्यात येईल. हा पैसा वसूल झाला तर कोणत्याही बँकेचे कर्ज घेण्याची गरज पडणार नाही. डॉ. तनपुरे कारखान्याचे २८ हजार सभासद असून त्यापैकी २२ शेतकर्‍यांची शेअर्स रक्कम अद्यापही पूर्ण नाही. त्यांनी ती पूर्ण केल्यास मदतच होईल. असे अनेक निर्णय घेता येतील, मात्र त्यासाठी कारखान्यावर सत्ता हवी आहे. ती हमी मिळत असल्यास आपण पुन्हा पुढाकार घेण्यास तयार आहोत. अन्यथा निवडणूकच होणार असेल तर तीही लढविण्याची आमची तयारी आहे,’ असंही खासदार सुजय विखे यांनी सांगितलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या