Ticker

6/Breaking/ticker-posts

'या' महिन्यात येऊ शकते तिसरी लाट ! टास्क फोर्सच्या हवाल्यानेअजित पवारांचा इशारा

 









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

बारामती: बारामती शहरासह तालुक्यात करोना संसर्गाचा दर पाच टक्क्यांच्या पुढे गेल्यास नाईलाजाने पुन्हा कडक निर्बंध लावावे लागतील. त्यामुळे सर्वांनीच खबरदारी घेणे आवश्यक असून करोना संसर्ग रोखण्यासाठी करोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. सप्टेंबर महिन्यात करोनाची तिसरी लाट येऊ शकते अशी शक्यता टास्क फोर्सने वर्तवली आहे, अशी महत्त्वाची माहितीही यावेळी अजित पवार यांनी दिली.

बारामती परिसरातील विकासकामांच्या पाहणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. बारामती शहरासह तालुक्यातील करोना संसर्गाची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण ,ऑक्सिजन उपलब्धता, आरोग्य सुविधा आदींबाबत उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.

बारामती शहरासह तालुक्यात करोना संसर्गाचा दर ५ टक्क्यांच्या पुढे वाढल्यास निर्बंध कडक करावे लागतील म्हणून सर्वांनीच खबरदारी घेतली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत करोना संसर्गाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढता कामा नये. टास्क फोर्सने सप्टेंबर महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यादृष्टीने सर्व नियोजन सुरू आहे. उपलब्ध ऑक्सिजनची आवश्यकता वाढण्याची शक्यता गृहित धरून ऑक्सिजनचा साठा करून ठेवणे आवश्यक आहे. ज्यांनी लसीकरणाचे दोन डोस घेतले आहेत त्यांनाच मॉलमध्ये प्रवेश देणे बंधनकारक करा. लसीकरणाचे नियोजन व्यवस्थित करावे. पहिला डोस घेतलेल्यांनाच प्रथम प्राधान्य द्या. बारामतीमध्ये एमआयडीसीमधील कंपन्यानी तसेच व्यापारी वर्गांने करोना नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून बारामती शहरात तसेच ग्रामीण भागात सोयीसुविधा उपलब्ध करून ठेवणे आवश्यक आहे. सर्व रुग्णालयांत ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था सुनिश्चित कराव्यात, अशा सूचना अजित पवार यांनी यावेळी दिल्या. तसेच करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. काही नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत. हे चालणार नाही. प्रत्येकाने मास्क वापरायलाच हवा. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याबाबतची दक्षताही घ्यायला हवी, असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले.

या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री पवार यांनी कऱ्हा नदी सुधार प्रकल्प, ख्रिश्चन कॉलनी येथील कॅनलवरील ब्रिजचे काम, परकाळे बंगला येथील कॅनलवरील रोड व सुशोभिकरण, क्रीडा संकुल, ज्येष्ठ नागरिक संघाची इमारत, बारामती कुस्ती केंद्र व पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या कामाची पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विकासकामांबाबत योग्य त्या सूचना देऊन विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत अशा सूचना दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या