Ticker

6/Breaking/ticker-posts

मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना नारायण राणे यांची जीभ घसरली, सेनानेते खवळले

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

महाड: नारायण राणे विरुद्ध शिवसेना असे युद्ध अधिकच भडकत असल्याचे दिसत आहे. आज जन आशीर्वाद यात्रेत महाडला असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलत असताना केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेना नेते संतप्त झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे यांची जीभ घसरली. मंत्रालयातील स्वातंत्र्यदिनाचा दाखला देत 'मी असतो तर कानाखाली चढवली असती', असे आक्षेपार्ह वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे.


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा महाड येथे आल्यानंतर राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना राणे उत्तरे देत होते. राज्याला तिसऱ्या लाटेचा धोका असून लहान मुलांना याचा अधिक धोका आहे, म्हणून गर्दी टाळावी असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे असल्याचे एका पत्रकाराने राणे यांना प्रश्न विचारताना सांगितले. त्यावर राणे चांगलेच भडकले.


राणे म्हणाले की, त्यांनाच काही कळत नाही, ते आम्हाला काय सांगणार. ते काय डॉक्टर आहेत का? तिसऱ्या लाटेचा आवाज त्यांना कुठून आला? आणि ती सुद्धा लहान मुलांना धोका आहे म्हणायचे आणि लोकांना घाबरवायचे. अपशकुनासारखे बोलू नको म्हणावे. त्याला बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल म्हणावे. त्या दिवशी नाही का, किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे, हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. हे काय, देशाच्या स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला, किती चीड येणारी गोष्ट आहे, अशा शब्दात राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र केले.

या सरकारला ड्रायव्हरच नाही

हे सरकार कोण चालवत आहे? या सरकारला ड्रायव्हरच नाही. फक्त राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता उपभोगत आहे, असे राणे एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

खासदार विनायक राऊत यांचे राणेंना प्रत्युत्तर

नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांबाबतच्या वक्तव्यानंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत चांगलेच भडकले आङेत. स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी नेहमीच चाटुगिरीची सवय लागलेल्या नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिपद मिळाले आहे. केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर आता त्यांचे मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडून गेले आहे. पण एक लक्षात ठेवावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याबद्दल अशा प्रकारे वक्तव्य करणाऱ्याचे हात छाटण्याची ताकद आम्हा मावळ्यांमध्ये आहे हे त्यांनी कदापि विसरता कामा नये, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला.

 

नारायण राणेंचा फुगा सर्वसामान्य शिवसैनिकांनी फोडला आहे: मनिषा कायंदे

नारायण राणे यांचा फुगा आता फुगा फुटलेला असून सामान्य शिवसैनिकांनीच त्यांचा फुगा फोडलेला आहे. ते ऑक्सिजनववर आहेत, अशा शब्दात शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी राणे यांना टोला लगावला आहे. नारायण राणेंवर घणाघाती हल्ला चढवत त्या पुढे म्हणाल्या की, आता दिल्लीश्वरांच्यासमोर मुजरा करण्यापलीकडे त्यांना कोणतेही काम उरलेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मातोश्री आणि शिवसेनेवर टीका करणे ही एकच जबाबदारी त्यांना देण्यात आलेली आहे. हेच त्यांचे ऑक्सिजन आहे. जर हे त्यांनी केले नाही तर त्यांचे मंत्रिपद जाणार. त्यामुळे मंत्रिपद टिकवण्यासाठी त्यांना हे करावेच लागणार आहे. हे लक्षात घेता नारायण राणे काय करत आहेत याची आम्हाला अजिबात चिंता नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या