लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर: ‘अहमदनगर जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या
वाढताना दिसत असली तरी त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. प्रशासनाने चाचण्यांची
संख्या वाढविल्याने बाधितांचे आकडे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वाढल्याचे दिसून येत
आहे. मात्र, तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाने घेतलेली ही
खबरदारी योग्यच आहे,’ असे स्पष्टीकरण खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले.
करोनासंबंधीच्या उपाययोजनांचा आढावा, लसीकरणाचे नियोजन यासंबंधी डॉ. विखे
पाटील यांनी जिल्हा परिषदेत बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही
माहिती दिली. ते म्हणाले, ‘मागील काही काळात नगर जिल्ह्यात
जवळपास एक लाख तीस हजार रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या, त्यामुळे
बाधित रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येते. पुणे जिल्ह्याखालोखाल नगर जिल्ह्यात
या चाचण्या झाल्या आहेत. ज्या धुळे जिल्ह्याला करोनामुक्त म्हटले जाते, तिथे केवळ आठ हजार चाचण्या करण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रशासनाने जास्तीत
जास्त चाचण्या करून बाधितांना विलगीकरणात पाठविण्याचे धोरण राबवले आहे. त्यामुळे
सध्या कागदावर आकडे वाढलेले दिसत असले तरी तो प्रशासनाच्या सकारात्मक कृतीचे
निदर्शक आहे. भविष्यात साथ नियंत्रणासाठी याचा उपयोग होणार आहे. जेवढे आपण
अधिकाधिक रुग्ण शोधून त्यांना बरे करू, तेवढी तिसरी लाट
येण्याची शक्यता कमी राहील.’
लसीकरणाच्या
गोंधळाबद्दल ते म्हणाले, ‘लसीकरणासंबंधी आतापर्यंत येथे ठोस नियोजन नव्हते. अधिकारी आपल्या पद्धतीने
नियोजन करीत होते. आता यासाठी सूत्र ठरवून देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील
नागरिकांना शहरात लस मिळणार नाही. त्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावरच त्यांनी
घ्यायची आहे. तर शहरातील नागरिकांनाही ग्रामीण भागात लस मिळणार नाही. कोव्हॅक्सिन
लस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने दुसरा डोस प्रलंबित राहिलेल्यांची संख्या
जास्त आहे. त्यामुळे दोन्ही लशींचे पहिला व दुसरा डोस राखीव ठेवण्याचे सूत्र
ठरविण्यात आले आहे.
लशीचा
पुरवठा कमी होत असल्याबद्दल केंद्र सरकारकडे बोट दाखविणे चुकीचे आहे. युरोपातील
देशांशी तुलना केली तर दररोज एका संपूर्ण देशाचे लसीकरण होईल, एवढी लस
आपल्याकडे उपलब्ध करून दिली जात आहे. आपल्या लोकसंख्येचा विचार केला तर हे काम किती
आव्हानात्मक आहे, हे लक्षात येते. तरीही पुढील महिन्यात
पुरवठा आणखी वाढण्यास मदत होणार आहे. सध्याच्या व्यवस्थेत काही सुधारणा करणे
अपेक्षित होते, त्या आम्ही केल्या आहेत. त्यामुळे १५
सप्टेंबरपर्यंत यासंबंधी नक्कीच सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येतील,’ असेही विखे पाटील म्हणाले.
0 टिप्पण्या