Ticker

6/Breaking/ticker-posts

शिर्डीचे साई मंदिर खुले करण्याची मागणी; पुढं आला 'हा' भन्नाट पर्याय

*शिर्डीचे साई मंदिर खुलं करण्याची भाजपची मागणी

*मंदिर खुलं करण्यासाठी सुचवण्यात आला 'हा' पर्याय

*आता राज्य सरकारच्या निर्णयाकडं लक्ष







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

शिर्डी: राज्यातील अनेक जिह्यांतील निर्बंध शिथील झाल्यानंतर आता भाजपकडून धार्मिक स्थळे खुले करण्याची मागणीही होऊ लागली आहे. शिर्डीतील साई मंदिर नियम व अटी घालून का होईना खुले करावे, अन्यथा पुन्हा आंदोलन करू, असा इशारा भाजयुवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी दिला आहे. 

मधल्या कळात मंदिर खुले असताना एकाही भक्ताला किंवा कर्मचार्‍याला करोनाची बाधा झाली नाही. आता लसीकरण वाढत असून लस घेतलेल्यांसाठी मंदिर खुले करण्याचा पर्याय असल्याचेही तांबे यांनी म्हटले आहे.

तांबे यांनी राज्य सरकारकडे ही मागणी केली आहे. अनेक राज्यांत मंदिरे खुली करण्यात आली आहेत. मात्र,  महाविकास आघाडीचे सरकार जाणीवपूर्वक निर्णय घेत नाही. पहिल्या लाटेचा जोर ओसरल्यानंतरही राज्यात मंदिरे उघडण्यास उशीर झाला होता. भाजपने आंदोलन केल्यानंतर ती उघडण्यात आली. आता दुसरी लाटही ओसरत आहे. त्यामुळे इतर व्यवहार सुरळीत करीत असताना मंदिरेही उघडली जावीत', अशी मागणी त्यांनी केली आहे.

' गेल्या अनेक महिन्यांपासून मंदिर बंद असल्याने शिर्डी व पंचक्रोशीचे अर्थकारण ठप्प झाले आहे. शिर्डीतील हॉटेल, रेस्टॉरंट, हार प्रसाद, विक्रेते, ट्रॅव्हल्स, फुलांचे शेतकरी, चहा नाष्टा विक्रेते असा प्रत्येक घटक संकाटत सापडला आहे. कर्जाचे हप्ते थकल्याने अनेक हॉटेल, घर, दुकाने सील केली जात आहेत. वीज बिल थकल्याने वीज पुरवठा खंडित केला जात आहे. शिर्डीत सुमारे एक हजार ठिकाणी वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई झाली आहे. 

शिर्डी नगरपंचायतीने मंदिरे बंद असल्याने घरपट्टी, पाणीपट्टी वेगवेगळे कर कमी करण्यासाठी प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे. त्यावर निर्णय झालेला नाही. आर्थिक अडचणीमुळे या भागातील जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे.

वास्तविक पाहता साईबाबा संस्थान प्रशासनाने सुरक्षित दर्शन व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे मंदिर खुले असताना एकाही भक्ताला व कर्मचार्‍याला करोनाची बाधा झाली नाही. साई मंदिर पूर्णपणे सुरक्षित असताना ऑनलाईन बुकिंगद्वारे व ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहेत या नियम अटीसह का उघडत नाही? असा प्रश्न पडतो. बार, दारू दुकाने सुरू आहेत, राजकीय कार्यक्रम सुरू आहेत, सर्व काही सुरळीत आहे. देशातील देवस्थाने उघडी असताना महाराष्ट्रातील बंद का? याविरोधात आम्ही तीव्र आंदोलन करणार असून त्याची जबाबदारी सरकारवर राहील,’ असेही तांबे यांनी म्हटले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या