Ticker

6/Breaking/ticker-posts

मोदींमुळे शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले अन ..१२ आमदार निलंबित केल्याने भाजप संतप्त.

 चंद्रकांत पाटील यांचा पुन्हा एकदा भास्कर जाधवांवर निशाणा.









लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 मुंबई: 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  सोमवारी संपूर्ण दिवस तोंडाला पट्टी बांधून सभागृहात बसले होते. कुठल्याही विषयाबाबत चर्चेतून तोडगा काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. त्याऐवजी केवळ घोषणा आणि निदर्शने केली म्हणून आमच्या आमदारांचे निलंबन केले. विधानसभेची समन्वयातून तोडगा काढण्याची परंपरा या सरकारने मोडीत काढली', अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.


तालिका अध्यक्ष पीठावरून उतरल्यावर इतर आमदारांप्रमाणेच साधा आमदार असतो.  भास्कर जाधव यांना धक्काबुक्की झालेली नाही आणि झाली असलीच तरी ती तालिका अध्यक्षांना झालेली नाही. त्यामुळे हा प्रश्न त्वरित समन्वयातून मार्गी लावलाही होता. मात्र, त्याबाबत महाविकास आघाडीतील नेते महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत, असा आरोप चंद्रकांत पाटील यांना केला. तालिका अध्यक्ष पीठासनावरून उतरल्यावर काही प्रकरण झाले असेलच, तर त्यावरून कारवाई होऊ शकत नाही. त्यामुळे आमच्या १२ आमदारांचे निलंबन नियमबाह्य आहे, असा दावाही पाटील यांनी केला आहे

नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिवसेनेचे ५६ आमदार आणि १८ खासदार निवडून आले आहेत. आज तेच आमदार सभागृहात भाजपचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. याविरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरून प्रखर संघर्ष करू, असे पाटील म्हणाले. या अधिवेशनात विविध विषय मांडता आले असते, मात्र राज्य सरकारला यात काहीही रस नव्हता, असे नमूद करताना भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष आहे. जनतेच्या हितासाठी उठणारा आमचा आवाज तुम्ही निलंबन करून रोखू शकणार नाही. आम्ही गावोगाव जाऊ, माध्यमांमार्फत आमचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवू, असेही पाटील यांनी सांगितले.

ओबीसी समाजाच्या मनातील रोष विधानसभेत मांडल्याबद्दल भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन केले गेले. या निलंबनाच्या निषेधार्थ आज विधानसभेच्या पायऱ्यांवरच भाजपाच्या वतीने अभिरूप विधानसभा भरवण्यात आली, असे सांगताना ठाकरे सरकारची मनमानी आमचा आवाज दाबू शकणार नाही, असा इशाराही पाटील यांनी दिला. हिंमत असेल तर गुप्त मतदान पद्धतीने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेऊन दाखवा. घटनेमध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही गुप्त मतदानानेच व्हायला पाहिजे, असेही पाटील अध्यक्ष निवडीवर म्हणाले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या