Ticker

6/Breaking/ticker-posts

नारायण राणे यांचे पुन्हा ‘कम बॅक’


 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची नुकतीच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी त्यांच्याकडं देण्यात आली आहे. मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळताच नारायण राणे यांनी पुन्हा एकदा आपल्या धडाकेबाज पद्धतीनं कामाला सुरुवात केली आहे. राणे पुन्हा एकदा फॉर्मात आल्याचं बोललं जात आहे. कोकणातील पूरग्रस्त भागांच्या दौऱ्याच्या वेळी घडलेल्या काही प्रसंगांमुळं ही चर्चा खरी ठरत असल्याचं दिसत आहे.

शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, खासदार ते केंद्रीय मंत्री असा प्रवास करणारे नारायण राणे यांची राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरू झाली. पद लहान असो की मोठे, राणेंची कामाची पद्धत नेहमीच धडाकेबाज राहिली. शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी काँग्रेसचा आधार घेतला. तिथं अपेक्षित न्याय मिळत नसल्यानं अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नारायण राणेंचं राजकारण संपल्याची चर्चा सुरू असतानाच भाजपनं त्यांना आता थेट केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिली आहे.

अतिवृष्टीनंतर कोकणात आलेल्या महापुराचा सर्वात मोठा फटका रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला बसला. चिपळूण शहर पाण्याखाली गेले तर महाडमध्ये दरड कोसळून मोठी जीवितहानी झाली. केंद्रीय मंत्री या नात्यानं नारायण राणेंनी दोन्ही ठिकाणचा दौरा केला. मंत्री झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दौरा होता. या दौऱ्यात त्यांनी लोकांना धीर दिलाच, पण पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री व राज्य सरकारवर टीका करून लक्ष वेधून घेतलं.

' सरकार आहेच कुठं?
शिवसेना सोडल्यापासून उद्धव ठाकरे हे नारायण राणे यांचं लक्ष्य राहिलं आहे. काँग्रेसमध्ये असतानाही ते शिवसेनेच्या कारभारावर व उद्धव ठाकरे यांच्यावर तोफा डागतच होते. आता केंद्रीय मंत्रिपदी आल्यानंतर टीकेची ही धार अधिक तीव्र झाली आहे. महाड येथील दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना राणेंनी राज्य सरकार व मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेतून त्याची चुणूक दिसली. ' सरकार आहेच कुठं? सरकारचा कोणताही माणूस लोकांना भेटत नाही. आता कुठं मुख्यमंत्र्यांना घरातून डिस्चार्ज मिळालाय, आता फिरायला लागलेत,' असं ते म्हणाले. त्यातून राणे यांनी आपली दिशा स्पष्ट केली.

'सीएम, बीएम गेला उडत...'

चिपळूणमधील पूरग्रस्त बाजारपेठेची पाहणी करताना राज्य सरकारचा एकही अधिकारी नारायण राणे यांच्यासोबत नव्हता. त्यामुळं ते भडकले. त्यांनी तिथूनच थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून फैलावर घेतलं. जिल्हाधिकाऱ्यांनी सीएमच्या दौऱ्याचं कारण सांगताच, 'सीएम, बीएम गेला उडत...' अशी भाषा राणेंनी वापरली. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली. एका केंद्रीय नेत्यानं मुख्यमंत्र्यांबद्दल वापरलेल्या या भाषेबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. पण राणेंनी त्याबद्दल खुलासा केल्याचं ऐकण्यात आलेलं नाही.

 

पद असो वा नसो, नारायण राणे यांनी राजकारणात आपला दरारा कायम राखला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वास संपादन केल्यामुळं शिवसेनेत राणे फॉर्मात होते. शिवसैनिकांमध्येही त्यांचा धाक होता. शिवसेना सोडल्यानंतर काँग्रेसच्या काळात त्यांना मंत्रिपद मिळालं खरं, मात्र त्याचा पूर्वीचा जोष दिसत नव्हता. आता भाजपमध्ये केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानं राणेंनी पुन्हा 'कार्यपद्धतीचा गिअर' बदलल्याचं दिसत आहे. याची प्रचिती चिपळूणमध्ये आली. चिपळूणमध्ये त्यांनी आपल्याच पक्षाचे नेते व सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले प्रवीण दरेकर यांनाच बोलताना गप्प केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. राणे आता याच स्टाइलनं पुढं जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या