Ticker

6/Breaking/ticker-posts

विषबाधेमुळे १३ मोरांचा दुर्दैवी मृत्यू ; वन्यजीवप्रेमींनी केली 'ही' मागणी

 *धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातल्या जैतपूर मोरांचा दुर्दैवी मृत्यू

*वन्यजीवांना जंगलांमध्ये पाणवठे व पुरेसे अन्नची व्यवस्था करा- वन्यप्रेमींची मागणी.



लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 धुळे: जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातल्या जैतपूर गावांमध्ये १३ मोरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुपारी अचानक हे मोर दादा राजपूत यांच्या शेतात मृतावस्थेत आढळून आले. वन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली. विषबाधेमुळे या मोरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिरपूर तालुक्यातील जैतपूर शिवारात दादा राजपूत यांचे शेत आहे. पाऊस नसल्याने या शेतात कोणतेही पीक घेण्यात आलेले नाही. दुष्कासदृश्य परिस्थितीमुळे जंगलात पुरेसे अन्न व पाणी मिळत नसल्याने जंगलातील मोर हे अन्नाच्या शोधात येथे आले. या भागांमध्ये प्रक्रिया केलेले बियाणे पेरण्यात आले होते. मात्र समाधानकारक पाऊस झालेला नसल्यामुळे हे बियाणे उगवले नाही. हे विषारी बनलेले बियाणे या जंगलातील मोरांनी खाल्ल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मृत १२ मोरांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, एका मोरावर शिरपूर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र दुर्दैवाने त्याचाही मृत्यू झाला आहे. या १३ मोरांमध्ये सात मोर तर सात लांडोरींचा समावेश आहे. वन्यजीव प्रेमींनी या मोरांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही अपयशी ठरला.

शिरपूर वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पशुवैद्यकीय विभागाच्या साहाय्याने या मोरांचे शवविच्छेदन केले असून, मोरांच्या पोटात बियाणे आढळून आले असल्याची प्राथमिक माहिती वनपाल कपिल पाटील यांनी दिली आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

या जंगल क्षेत्रांमध्ये पहिल्यांदाच अशी मोठी दुर्दैवी घटना घडली असल्याने खळबळ उडाली आहे. मोरांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वन्यप्रेमींनीही या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दुष्काळाचा विचार करून वन्यजीवांना जंगलांमध्ये पाणवठे व पुरेसे अन्न मिळेल याची काळजी घेणे गरजेचे असल्याची त्यांनी मागणी केली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या