Ticker

6/Breaking/ticker-posts

‘आता तरी ..सण उत्साहात साजरे करू द्या’

 








लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

औरंगाबाद : एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेण्यास पंढरपूरला जाण्यासाठी वारकऱ्यांच्या जुन्या परंपरेनुसार दिंडीद्वारे पायीवारी, गणेश उत्सव तसेच बकरी ईदचा सण धार्मिक परंपरेनुसार साजरी करण्यास राज्य शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार इम्प्तियाज जलील यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. गेल्या वर्षी करोनाच्या प्रादुर्भाव पाहता सर्वच धर्माच्या भाविकांनी नियमांचे पालन करुन प्रशासनाला आणि सरकारला आवश्यक ते सहकार्य केले होते. आता करोनाची स्थिती आटोक्यात आलेली असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व समाजाच्या धार्मिक परंपरेत खंड पडू नये म्हणून शासनास सहकार्याची भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच राज्य शासनाने करोनाचे सावट कमी झाल्यानंतरधार्मिक सण, उत्सव व कार्यक्रमांवर अनेक कठोर निर्बंध लादलेले असल्याने सर्वच समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याची खंत पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

वारकऱ्यांना अटक करणे निंदनीय

वारकऱ्यांसह पंढरपूर येथे वारी करुन एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. शेतकरी, ग्रामीण भागातील नागरीक दरवर्षी या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतात तसेच मोठ्या उत्साहाने दिंडीचे स्वागत करतात. वारकऱ्यांना दिंडीत सहभागी होऊ न देणे, छळ करणे आणि कायदेशीर कार्यवाही करून अटक करण्याचा प्रकार निंदनीय असल्याचे त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवातून अर्थव्यवस्थेला गती

गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव असून त्या उत्सवानिमित्त दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. मूर्ती निर्मितीचे काम करणारे कारागीर, मूर्ती व पूजेचे साहित्य विक्री करणारे छोटे-छोटे व्यापारी व त्यावर अवलंबून असलेल्या वस्तूंची विक्री करणारे व्यापारी अशा साऱ्यांचा व्यवसाय या उत्सवावर अवलंबून असतो. गणेश भक्तांना उत्साहात व परंपरेनुसार उत्सव साजरा करण्याची परवानगी दिल्यास त्यांचा आनंद द्विगुणित होईल. हा सण साजरा करण्यासाठी गणेशभक्तांना मोठी सुविधा उपलब्ध करुन दिल्यास अर्थव्यवस्थेला गती येईल, असेही खासदार जलील यांनी म्हटले आहे.

ईद-उल-अजहाबाबतही विचार करा

ईद-उल-अजहा (बकरी ईद) मुस्लिम समाजाचा महत्त्वाचा सण आहे. तो जगासह राज्यात धार्मिक रितीरिवाज व परंपरेनुसार एकाच पद्धतीने मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरी करण्याची जुनी परंपरा आहे. बकरी ईद सणानिमित्त अनेक छोटे-छोटे व्यापारी, शेतकरी व त्यावर अवलंबून असलेल्या वस्तूंची विक्री करणारे व्यापाऱ्यांचे संपूर्ण वर्षभराचा उदरनिर्वाह अवलंबून असतो, याकडे खासदार जलील यांनी लक्ष वेधले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या