Ticker

6/Breaking/ticker-posts

दीर्घ प्रतिक्षेनंतर मुळामाई झाली वाहती ,मात्र प्रवरा अजून कोरडी ठाक











लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


अकोले : गेल्या चोवीस तासांपासून हरिश्चंद्रगडाच्या माथ्यावर संततधार सुरु असल्याने मुळेच्या प्रवाहात भर पडली असून मोठ्या प्रतीक्षेनंतर कोतुळनजीकच्या मुळापात्रातून 1 हजार 158 क्युसेक्सचा प्रवाह वाहू लागल्याने मुळमाई वाहती झाली आहे. मात्र 


जिल्ह्यातून जिल्ह्यातच वाहणार्‍या मुळा आणि प्रवरा या दोन मोठ्या नद्यांच्या खोर्‍यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात पावसाचा अक्षरशः झंझावात सुरु असतो. विशेष म्हणजे यावर्षी पाणलोट क्षेत्रात पावसाने वेळेवर हजेरीही लावली होती. मात्र त्यानंतर त्याने दीर्घकाळ पाठ दाखवल्याने आदिवासी बांधवांच्या चिंता वाढल्या आहेत. एकीकडे पाणलोटाला मोठ्या पावसाची प्रतीक्षा असताना दुसरीकडे लाभक्षेत्रात सर्वदूर पाऊस झाल्याने एका डोळ्यात हसू तर दुसर्‍या डोळ्यात आसू अशी विचित्र स्थिती सध्या या दोन्ही नद्यांच्या लाभक्षेत्रात निर्माण झाली आहे.

जुलै महिन्याचा मध्य आला तरीही जिल्ह्यातील मोठ्या धरणांच्या पाणलोटात अजूनही पावसाला जोर नसल्याने भात शेती करणार्‍या आदिवासी बांधवांच्या चिंता वाढल्या आहेत. जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यात मुळा आणि प्रवरा या दोन्ही नद्यांच्या खोर्‍यात तुफान पर्जन्य बरसत असतो. यंदामात्र अजूनपर्यंत पावसाला रंग चढला नसल्याने धरणांमधील पाण्याची आवक रोडावलेलीच आहे. मात्र गेल्या चोवीस तासांत मुळा खोर्‍यातील पावसाचे आगार समजल्या जाणार्‍या हरिश्चंद्रगडाच्या माथ्यावर पावसाची संततधार सुरु असल्याने मोठ्या प्रतिक्षेनंतर मुळेच्या प्रवाहाने एक हजार क्युसेक्सचा टप्पा ओलांडला आहे. मागील काही दिवसांपासून या परिसरात अधुनमधून आषाढ सरींचा जोर वाढत असल्याने मुळा धरणातील पाण्याची आवकही संथगतीने सुरु आहे. मात्र दोन्ही धरणांच्या पाणलोटात अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस पडलेला नाही.

उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायी असलेल्या प्रवरा नदीच्या खोर्‍यातील घाटघर व रतनवाडी ही दोन ठिकाणं जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचे आगार समजले जातात. दरवर्षी जुलैच्या सुरुवातीपासून या परिसरात पावसाचा अक्षरशः झंझावात सुरु असतो. त्यामुळे भंडारदरा धरणाच्या जलाशयाला कोंडाळे केलेल्या सह्याद्रीच्या शिखरांवरुन शेकडो जलप्रपात धरणीच्या दिशेने धाव घेत असल्याचे दृश्य दिसत असते. या कालावधीत परिसरातील निसर्ग सौंदर्य बहरत असल्याने राज्यातील विविध ठिकाणाहून हजारो पर्यटक येथे गर्दी करतात. यावर्षी मात्र जुलै महिन्याचा मध्य येवूनही भंडारदर्‍याच्या संपूर्ण पाणलोटात अजूनही पावसाला जोर नसल्याने या भागातील जलप्रपात दिसेनासे झाले आहेत.


मुळा नदीच्या खोर्‍यातील हरिश्चंद्रगडाचा परिसर तुफान पावसाचे आगार समजले जाते. विस्तीर्ण परिसर असलेल्या या भागात पडणार्‍या जलधारा छोट्या-मोठ्या ओहोळांमधून मुळानदीत जावून मिसळतात, त्यामुळे जुलैच्या महिन्यात मुळा नदी हमखास दुथडी भरुन वाहत असते. मुळा खोर्‍यातील 192 दश लक्ष घनफूट क्षमतेच्या आंबित आंबित पाठोपाठ 600 दशलक्ष घनफूट क्षमतेचा पिंपळगाव खांड प्रकल्पही यापूर्वीच भरल्याने मुळा धरणात संथगतीने पाण्याची आवक सुरु आहे. मात्र मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्यानंतर पावसाला पुन्हा जोरच चढला नसल्याने या भागालाही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र गेल्या चोवीस तासांपासून हरिश्चंद्रगडाच्या माथ्यावर संततधार सुरु असल्याने मुळेच्या प्रवाहात भर पडली असून मोठ्या प्रतीक्षेनंतर कोतुळनजीकच्या मुळापात्रातून 1 हजार 158 क्युसेक्सचा प्रवाह वाहू लागला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या