Ticker

6/Breaking/ticker-posts

मोदींची 'मन की बात', आकाशवाणी मालामाल..! ३० कोटींहून अधिकची कमाई







 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नवी दिल्लीः संवादाच्या नव्या माध्यमांमध्ये घुसमटत असलेल्या रेडिओला 'मन की बात' या कार्यक्रमाने ऑक्सिजन दिला आहे. रेडिओसाठी हा प्रयोग वरदान ठरला आहे. 'मन की बात'  हा पंतप्रधान मोदींचा महिन्याचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामुळे रेडिओची लोकप्रियता वाढली आहे. एवढचं नव्हे तर कोट्यवधींचे उत्पन्नही मिळाले आहे. २०१४ मध्ये 'मन की बात' हा कार्यक्रम सुरू झाला. या कार्यक्रमामुळे ३०.८० कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. सर्वाधिक कमाई ही १०.६४ कोटी २०१७-१८ मध्ये झाली. राज्यसभेत एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली.

भाजप खासदार राकेश सिन्हा यांनी यासंबंधी प्रश्न उपस्थित केला होता. पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाने रेडिओची लोकप्रियता वाढली आहे का? आणि नवसंजीवनी मिळाली आहे का? प्रश्न करण्यात आला होता. त्याला हो, असं उत्तर मंत्री ठाकूर यांनी दिलं आहे. 'मन की बात'  या रेडिओ कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान मोदी देशातील जनतेशी संवाद साधत आहेत. हा एक  अभिनव कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाद्वारे प्रत्येक नागरिकाला जोडलं जातंय, सूचना मागवल्या जात आहेत आणि त्यांना शासनाचा एक भाग होण्याची संधीही दिली जात आहे, असं ठाकूर म्हणाले.


दूरदर्शनचे ३४ चॅनेल्स आणि जवळपास ९१ खासगी टीव्ही चॅनेल्सद्वारे संपूर्ण भारतात या कार्यक्रमाचे प्रसारण केले जात आहे. या कार्यक्रमाच्या प्रेक्षकांची संख्या ही ११.८ कोटी इतकी आहे. या कार्यक्रमामुळे पारंपरिक रेडिओमध्ये नागरिकांची रुची वाढली असून जागरूकताही निर्माण झाली आहे, असं ठाकूर यांनी सांगितलं.

कुठल्या वर्षी किती कमाई झाली?

२०१७-१८, २०१८-१९, २०१९-२०२०, २०२०-२१ मध्ये आकाशवाणीला किती उत्पन्न मिळाले? असा प्रश्न करण्यात आला. याबद्दलही माहिती ठाकूर यांनी दिली आहे. २०१७-१८ मध्ये १०,६४,२७,३०० कोटी रुपये, २०१८-१९ मध्ये ७,४७,००,००० कोटी रुपये, २०१९-२०२० मध्ये २,५६,००,००० कोटी रुपये आणि २०२०-२१ मध्ये १,०२,००,००० कोटी रुपये उत्पन्न मिळाले.

२०१४ पासून ३०.८० कोटींच उत्पन्न

२०१४ पासून ते आतापर्यंत 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे आकाशवाणीला ३०.८० कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. सर्वाधिक उत्पन्न हे २०१७-१८ मध्ये मिळाले. सर्वात कमी कमाई ही २०२०-२१ मध्ये झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा हेतू हा कमाईचा नाही तर सराकरच्या मुद्द्यांवर नागरिकांशी संवाद साधण्याचा आहे, असं अनुराग ठाकूर यांनी आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलं.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या