Ticker

6/Breaking/ticker-posts

सावधान..! जिल्ह्यात दैनंदिन करोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ

 *२४ तासांत जिल्ह्यात तब्बल १०२६ नवीन रुग्णांची भर.

*जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सध्या ४ हजार ४९६ इतकी.

* आजपासून नियम न पाळणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अ.नगर: राज्यात करोना रुग्णांचे आकडे कमी होत असताना नगर जिल्ह्यात मात्र उलटा प्रवास सुरू झाल्याचे दिसून येत आहे. सुमारे दीड महिन्यानंतर जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्या पुन्हा चार अंकी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत ७५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर १०२६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पारनेर तालुक्यात सर्वाधिक २१० रुग्ण आहेत. जिल्ह्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या आता ४,४९६ झाली आहे.


जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यातील दैनंदिन रुग्णांची संख्या हजाराच्या आत आली होती. बराच काळ ती पाचशेच्या आत होती. गेल्या आठवड्यापासून ती पुन्हा वाढू लागली. रविवारी हजाराचा टप्पा ओलांडला. पारनेर, जामखेड, शेवगाव, कर्जत, संगमनेर या तालुक्यांत लक्षणीय वाढ झाली आहे. तुलनेत लोकसंख्या जास्त असून नगर शहरात ही संख्या २३ वरच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पारनेर तालुक्यात सर्वाधिक नवे रुग्ण आढळून येत आहे. तेथे सध्या अनेक उपाययोजना केल्याचे सांगण्यात येत असले तरी आकडे कमी होताना दिसत नाहीत. लग्न, वाढदिवस यासारख्या कार्यक्रमांमुळे संसर्ग वाढत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. असे असले तरी राजकीय बैठका आणि कार्यक्रमही जोरात सुरू आहेत. पारनेमधील नमूने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत, त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.

जिल्ह्यात रविवारी ७५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. उपचाराधीन रुग्णांची संख्या ४,४९६ झाली आहे. दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील आकडे फिरल्याचे पाहून आता प्रशासनाने पुन्हा उपाय योजना कडक करण्याचे ठरविले आहे. पोलिस अधीक्षक मनोर पाटील यांनी सांगितले की, सोमवारपासून नियम न पाळणाऱ्यांविरूद्ध कारवाईची मोहीम कडक करण्यात येणार आहे.

वीक एंड लॉकडाउन आणि अन्य नियमांचे पालन करण्याकडे नागरिकांचा कल नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. उलट बहुतांश पक्षांचे राजकीय कार्यक्रम जोरात सुरू आहेत. राज्यस्तरावरील नेते जिल्ह्यात येऊन बैठका, मेळावे घेत आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचेही कार्यक्रम सुरूच आहेत. त्यासाठी मोठी गर्दी होताना दिसत आहेत. पारनेर तालुक्यात एका बाजूला कडक निर्बंध लावताना दुसरीकडे प्रशासकीय अधिकारीही गर्दीच्या कार्यक्रमांना हजेरी लावताना आणि नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. एकूणच सर्वच पातळ्यांवरील उदासीनता जिल्ह्यातील नागरिकांना महागात पडू लागल्याची चिन्हे दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या