Ticker

6/Breaking/ticker-posts

आषाढीवर यंदाही कोरोनाचे सावट ; पंढरपुरात १७ ते २५ जुलैपर्यंत संचारबंदी?,

* १७ ते २५ जुलैपर्यंत संचारबंदीच्या प्रस्तावास हिरवा कंदील.

* चंद्रभागा परिसरातही कलम १४४ लागू केले जाणार.



लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 पंढरपूर: गेल्यावर्षी पेक्षा यंदा राज्यात आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्यात अजूनही करोना संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने आषाढी यात्रेदरम्यान १७ ते २५ जुलैपर्यंत पंढरपूर शहर आणि परिसरातील १० गावांत संचारबंदीचा प्रस्ताव शासनाला देण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते  यांनी सांगितले. याबाबत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावाला शासनाने हिरवा कंदील दाखवला असून लवकरच याबाबत सविस्तर आदेश निघण्याची शक्यता आहे.


यंदा सर्व मानाच्या १० पालख्या बसमधून दशमी दिवशी पंढरपूर येथे येणार असून पौर्णिमेला परत जाणार असल्याने १७ ते २५ जुलैपर्यंत संचारबंदीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. याकाळात सोलापूर जिल्हा सीमा, पंढरपूर तालुका सीमा आणि पंढरपूर शहर सीमा अशा तीन ठिकाणी तिहेरी नाकाबंदी करण्यात येणार असून परवानगी दिलेल्या भाविकांशिवाय कोणालाही आषाढीसाठी प्रवेश दिला जाणार नाही. तरीही काही भाविक पंढरपूरकडे आले तर त्यांची समजूत घालून त्यांना परत पाठवले जाणार असल्याचे तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.


आषाढी यात्रा काळात चंद्रभागेत स्नानासाठी भाविकांनी येऊ नये म्हणून चंद्रभागेच्या परिसरात कलम १४४ लागू केले जाणार आहे. ज्या भाविकांना शासनाने परवानगी दिली आहे अशा भाविकांना पासेस देऊन त्यांनाच नगरप्रदक्षिणा आणि विठ्ठल मंदिरात सोडण्यात येणार आहे. याशिवाय पंढरपूर शहरातील नागरिकांनाही बाहेर पडता येणार नसल्याचे सातपुते यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यात करोनाचे संकट अजूनही कायम असल्याने ही खबरदारी घेतली जात असून प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावाला शासनाने हिरवा कंदील दाखवल्याने लवकरच याबाबत सविस्तर आदेश निघतील, असे तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या