Ticker

6/Breaking/ticker-posts

मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा काऊंटडाऊन ; या युवा चेहऱ्यांची जागा जवळपास नक्की ?

 

मोदींच्या चार दिवसात अनेक महत्त्वाच्या बैठका

महाराष्ट्रातून प्रितम मुंडें तसेच ज्योतिरादित्य शिंदे आणि वरुण गांधींचंही नाव चर्चेत


लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या चार दिवसात भाजपचे वरिष्ठ नेते आणि दोन विविध मंत्रीगटांसोबत बैठका केल्या आहेत. त्यामुळे बहुप्रतिक्षित केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचा काऊंटडाऊन सुरू झाल्याचं बोललं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुसरी कारकीर्द ३० मे २०१९ रोजी सुरू झाली होती. त्यानंतर हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार असेल. चांगली कामगिरी न केलेल्या मंत्र्यांच्या जागी युवा चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे.


लोकजनशक्ती पक्षाचे दिवंगत अध्यक्ष रामविलास पासवान आणि भाजप नेते सुरेश अंगडी यांची जागा रिक्त आहे. कॅबिनेट आणि राज्यमंत्रिमंडळातही जागा खाली आहे. शिरोमनी अकाली दल आणि शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे अजून दोन कॅबिनेट जागा रिक्त झाल्या होत्या.

कॅबिनेट विस्तार रखडल्यामुळे अनेक मंत्र्यांकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योग, अन्न आणि ग्राहक आणि कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे ग्रामविकास मंत्रालय देण्यात आलं आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विस्तारासाठी याआधीच मंत्र्यांच्या कामगाजाचा आढावा घेणं सुरू केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चांगली कामगिरी नसलेल्या मंत्र्यांना विस्तारातून वगळलं जाणार आहे. या जागी युवा नेत्यांना संधी दिली जाईल, ज्यात महाराष्ट्रातीलही एक नाव चर्चेत आहे. भविष्यात निवडणुका असलेल्या राज्यातील खासदारांचं मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व वाढवलं जाऊ शकतं, असंही बोललं जातं.

कोणकोणत्या नावांची आहे चर्चा ?

डॉ. प्रितम मुंडे : बीडच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या नावाचीही चर्चा आहे. त्या दुसऱ्यांदा बीडच्या खासदार असून दिग्गज दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या त्या कन्या आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाल्यापासूनच प्रितम मुंडे मंत्रिपदाच्या दावेदार मानल्या जातात. उच्चशिक्षित खासदार आणि ओबीसी चेहरा अशी त्यांची ओळख आहे.


ज्योतिरादित्य शिंदे : माजी केंद्रीय मंत्री आणि चार वेळा खासदार राहिलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी मार्च २०२० मध्ये काँग्रेसला रामराम ठोकला. परिणामी मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार कोसळलं आणि भाजपची सत्ता आली. सध्या भाजपकडून राज्यसभेवर ते आहेत. त्यांना या विस्तारात संधी दिली जाऊ शकते.


दिनेश त्रिवेदी : टीएमसीचे माजी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी मार्चमध्ये भाजपात प्रवेश केला. टीएमसी सोडताना त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.


भूपेंदर यादव : राजस्थानमधील नेते भूपेंद्र यादव हे भाजपचे राज्यसभेतील खासदार आहेत.


अश्विनी वैष्णव : ओदिशा केडरच्या माजी आयएएस अधिकारी अश्विनी वैष्णव यांनी जून २०१९ मध्ये भाजपात प्रवेश केला होता.


वरुण गांधी : दिवंगत नेते संजय गांधी आणि माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांचे चिरंजीव वरुण गांधी यांच्या नावाचीही चर्चा आहे.

जमयांग सेरिंग नामग्याल : लडाखचे खासदार जमयांग सेरिंग नामग्याल यांच्या नावाचीही चर्चा आहे. २०१९ मध्ये लोकसभेतील भाषणाने त्यांनी सर्वांना प्रभावित केलं होतं.


नारायण राणे : काँग्रेस सोडून भाजपात आलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नावाचीही चर्चा आहे.


मोदी सरकारने ३० मे २०१९ रोजी ५७ मंत्र्यांसह (२४ कॅबिनेट, ९ राज्यमंत्री - स्वतंत्र प्रभार आणि २४ राज्यमंत्री) शपथ घेतली होती. गेल्या सरकारच्या तुलनेत १२ मंत्री जास्त होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या