Ticker

6/Breaking/ticker-posts

करोनाची तिसरी लाट रोखणं अशक्य, AIIMS प्रमुखांचा इशारा

 






लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 नवी दिल्ली : भारतात येत्या सहा ते आठ आठवड्यांत करोना विषाणू संक्रमणाची तिसरी लाट देशात दाखल होऊ शकते. ही तिसरी लाट रोखणं अशक्य असल्याचं मत 'ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स' प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केलंय.


' कोव्हिशिल्ड' लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय चुकीचा म्हणता येणार नाही, कारण यामुळे जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो, असंही मत डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केलंय. आत्तापर्यंत देशातील ५ टक्के लोकसंख्येला करोना लसीचे दोन डोस देण्यात आले आहेत. या वर्षीच्या शेवटपर्यंत देशातील १०८ कोटी लोकसंख्येचं लसीकरण करणं, हे सरकारचं लक्ष्य आहे आणि हे एक मोठं आव्हान आहे.


करोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत मार्च महिन्याच्या शेटी सुरु झालेले लॉकडाऊनचा सिलसिला देशभरात आता कुठे हळूहळू कमी होताना दिसतोय. त्यातच तज्ज्ञांकडून तिसऱ्या करोना संक्रमणाच्या लाटेच्या शक्यतेवर सावधगिरीचा इशारा दिला जातोय.

 

' देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे, कोविड नियमांसंबंधी ढिलाई दिसून येत आहे. आपण कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतून काहीही धडा घेतल्याचं सध्याच्या परिस्थितीतून दिसून येत नाही. पुन्हा एकदा गर्दी दिसून येतेय. अनेक लोक एकत्र येत आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर येत्या सहा ते आठ आठवड्यांत करोना संक्रमणाची तिसरी लाट दाखल होऊ शकते. किंवा त्यापेक्षा थोडा अधिकही वेळ लागू शकतो. कोविड नियम आपण कशा पद्धतीने हाताळतो आणि गर्दीपासून वाचण्याचा कसा प्रयत्न करतो, त्यावर हे अवलंबून आहे', असंही गुलेरिया यांनी म्हटलंय.

' रॉयटर्स'च्या एका सर्व्हेनुसार, देशात ऑक्टोबर महिन्यापर्यंत करोनाची तिसरी लाट दाखल होऊ शकते. या सर्व्हेत जगभारतील ४० तज्ज्ञ, डॉक्टर, वैज्ञानिक, विषाणूशास्त्रज्ञ, एपिडेमिओलॉजिस्ट आणि प्राध्यापकांचा समावेश करण्यात आला होता. जास्तीत जास्त लोकांना लसीकरणात सहभागी करून करोनाच्या लाटेवर नियंत्रण ठेवता येऊ शकतं, असं मतही या तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत संक्रमणाची संख्या कमी असू शकते, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आलीय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या