Ticker

6/Breaking/ticker-posts

'बाळासाहेबांचा आशीर्वाद नसता तर 'हे' येथे दुर्बिणीने शोधूनही सापडले नसते'

 







लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई: बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद नसता तर हे दुर्बिणीने शोधूनही महाराष्ट्रात सापडले नसते, असे टीकास्त्र शिवसेनेचे खासदारअरविंद सावंत यांनी भारतीय जनता पक्षावर सोडले आहे. अदर पूनावाला यांना देण्यात आलेल्या धमकीच्या मुद्द्यावरून सावंत यांनी हा निशाणा साधला आहे. अदर पूनावाला यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर असून माणसाचा जीव वाचवण्याचे काम ते करतात आणि ते ही महाराष्ट्रात. याचा आम्हाला आदर आहे. शिवसेना आक्रमक संघटना असली तरी आम्ही ही भाषा वापरत नाही, असेही सावंत यांनी म्हटले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या संघटनेचं नाव स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे. त्यांनी त्याचा उल्लेख SS असा केला. मात्र SS म्हणजे यांना शिवसेना वाटले, असे सावंत म्हणाले. पुनावाला यांना धमक्या देऊन आम्ही लोकांचे जीव वाचवण्याचे काम कसे बरे करणार?, असे सांगत हा आरोप शिवसेनेला बदनाम करण्यासाठी केला जात असल्याचे ते म्हणाले.

'उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग'

पुनावाला  यांना शिवसेनेने धमकी दिलेली नाही. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग या उक्तीप्रमाणे यांना सत्तेवर येण्याची घाई झालेली आहे. पश्चिम बंगालच्या जनतेने यांना चांगलाच धडा शिकवला. महाराष्ट्राने तर त्याना या आधीच धडा दिला होता, असे सांगतानाच बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद नसते तर हे दुर्बिणीने शोधूनही महाराष्ट्रात सापडले नसते, असा टोलाही सावंत यांनी भाजपला लगावला आहे.


राज्यात सत्तांतर होईल असे पंढरपूर पोटनिवडणुकीतील विजयानंतर विरोधकांना वाटत आहे. मात्र त्यांना जर तसे वाटत असेल तर बंगाल आणि इतर राज्यातील विधानसभा निवडणूक निकालांवरुन केंद्र सरकारनेही राजीनामा दिला पाहिजे, असे म्हणत या निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी भारतीय जनता पक्ष स्वीकारणार का?, असा प्रश्नही सावंत यांनी विचारला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या