Ticker

6/Breaking/ticker-posts

मराठा समाजासाठी ३ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करा ; चंद्रकांत पाटील यांची मागणी

 







लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क   )

कोल्हापूर : मराठा आरक्षण प्रश्नी केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही तातडीने सर्वोच्च न्यायालयात फेर याचिका दाखल करावी, तसेच आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत जे जे ओबीसी समाजाला ते ते सर्व मराठा समाजाला सुविधा देण्यासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली. ही घोषणा करण्याचे धाडस मंत्रिमंडळातील कुठल्याच नेत्याकडे नाही, अजित पवार डायनॅमिक आहेत, त्यांनी ठरवलं तर ते घोषणा करू शकतात, पण ते का करत नाहीत असा सवालही आमदार पाटील यांनी केला.

कोल्हापुरात झालेल्या पत्रकार बैठकीत पाटील म्हणाले, मराठा आरक्षण रद्द झाल्याने या समाजात मोठी अस्वस्थता पसरली . पण केंद्राने फेरयाचिका दाखल केल्याने थोडा तरी दिलासा मिळाला आहे. मुळात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी अशी फेरयाचिका दाखल करणे आवश्यक होते. पण, तसे झाले नाही. समिती नेमून या सरकारने वेळकाढूपणा चालवला आहे. केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही तातडीने आता फेरयाचिका दाखल करण्याची गरज आहे. शिवाय नवीन मागास आयोग स्थापन करून मराठा हे मागास आहेत याचे नवे पुरावे द्यावे लागतील.

आमदार पाटील म्हणाले, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ओबीसी समाजाला मिळणाऱ्या सर्व सवलती या समाजाला दिल्या जाव्यात. त्यासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे. केवळ रोज सकाळी उठून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या नावाने बोंब मारण्यापेक्षा राज्य सरकारने आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काहीतरी सकारात्मक निर्णय घ्यावेत अशी मागणीही त्यांनी केली.

आमदार पाटील पुढे म्हणाले, गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही मराठा समाजाला सवलती द्या म्हणून मागणी करत आहोत. पण मंत्रिमंडळातील एकही मंत्री ते देतो म्हणण्याचे धाडस करताना दिसत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार डायनॅमिक आहेत. त्यांच्यात ती धमक आहे. अनेक निर्णय ते ऑन दी स्पॉट घेतात. मग मराठा समाजाबाबत निर्णय घ्यायला विलंब का असा सवालही पाटील यांनी केला.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या