Ticker

6/Breaking/ticker-posts

करोनाची दुसरी लाट ओसरू लागली! ; मुख्यमंत्री ठाकरे यांचे सावधांनतेचेआवाहन

 




लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

शिर्डी: ‘करोनाच्या दुसऱ्या लाटेत आपल्याला ऑक्सिजन मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागले. त्यामुळेच अशा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना चालना देण्याचे आणि प्रोत्साहन देण्याचे धोरण आता राज्य शासनाने ठरविले आहे. सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनसाठी इतरांवर अवलंबून राहणे परवडणारे नाही. त्यामुळे राज्यासाठी आवश्यक तीन हजार टन ऑक्सिजन निर्मिती राज्यातच व्हावी, यासाठी ठिकठिकाणी प्रकल्प उभारणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.


शिर्डी येथील साईबाबा संस्थान संचालित साईबाबा सामान्य रुग्णालय येथील मेडिकल ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प   आणि आरटीपीसीआर लॅबचे आज दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री 
अजित पवार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी या कार्यक्रमात दूरदूश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.


करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसते आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. अशावेळी आपण त्यासाठी आवश्यक आरोग्य सुविधांनी युक्त असले पाहिजे, असे यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. साईबाबा यांनी कायमच गरीब-गरजूंना मदत केली आहे. त्यांच्यावर श्रद्धा असणारे लाखो भक्त देश आणि विदेशात आहेत, असे नमूद करताना संस्थानने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा घेतलेला निर्णय हा रुग्णांचे जीव वाचविणारा ठरणार आहे. संस्थानने नेहमीच संकटाच्या काळात मदतीसाठी पुढाकार घेतला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.


उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘राज्याने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या पद्धतीने सामना केला, त्याची दखल केंद्रीय आरोग्य मंत्रालय, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि अगदी उच्च न्यायालयानेही घेतली आहे. दुसऱ्या लाटेत तरुण वर्ग बाधित होण्याचे प्रमाण दिसून आले. संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचा सामना करण्यासाठी आपण पूर्वतयारी करत आहोत. या लढ्यात लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका, पोलीस सर्वजण सहभागी आहेत.'

संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी या ऑक्सिजन प्रकल्प निर्मीती आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळेबाबत माहिती दिली. हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाची क्षमता १२०० लिटर प्रतिमिनिट इतकी आहे. त्यातून ३०० बेडच्या हॉस्पिटलची गरज भागणार आहे. या प्रकल्पाकरिता रिलायन्स फांऊडेशन तर्फे अनंत अंबानी व साईभक्त व्ही. रमणी यांनी आर्थिक सहाय्य केले आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या