Ticker

6/Breaking/ticker-posts

ना रेमडेसिव्हीर ना महागडी औषधं, कमी खर्चात कोरोना रुग्ण ठणठणीत; जामखेडच्या ‘या’ डॉक्टरची किमया..!

 







लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर : कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे सध्या सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे.  कोरोना संसर्ग झाल्यानंर प्राण वाचवण्यासाठी अनेकांना औषध आणि इंजेक्शन साठी धावाधाव करावी लागतेय. यामध्ये अनेकांना महागडी औषधं घेणं परवडत नाहीये. मात्र अशा बिकट परिस्थितीत जामखेड येथील डॉ. रवी आरोळे यांच्या उपचार पद्धतीची विशेष चर्चा होत आहे. कमी खर्चात उपचार करणाऱ्या जुलिया हॉस्पिटलची दखल आमदार रोहित पवारांनीसुद्धा घेतली आहे. त्यासाठी त्यांनी खास ट्विट केलंय.

 

डॉ. रवी आरोळेंच्या उपचाराची रोहीत पवारांकडून दखल

सध्या राज्यात कोरोना महामारीच संकट ओढवलंय. दरोरोज लाखोंच्या संख्येने रुग्ण वाढतायत. अनेकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीये तर काहींना उपचार परवडत नाहीये. मात्र सध्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड शहरतील डॉ. रवी आरोळे यांची उपचार पद्धतीची अनेक ठिकाणी चर्चा रंगली आहे. जामखेडच्या जुलिया हॉस्पिटलमध्ये डॉक्टर डॉ. रवी आरोळे हे कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार करतायत. विशेष म्हणजे डॉ. रवी आरोळे यांनी रेमडेसिव्हीर या महागड्या औषधाचा कमीत कमी वापर केला आहे. त्यांनी आयसीएमआरने सांगितलेल्या औषधांचा वापर करुन आतापर्यंत 3700 रुग्णांना बरं केलंय. या सेंटरचा मृत्युदर हा सरासरीपेक्षाही कमी म्हणजेच अवघा 0.64 % एवढा आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनीदेखील ट्विट करून या उपचार पद्धतीची माहिती दिलीये. जामखेडमध्ये आरोळे हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमधील डॉक्टरांनी एक स्वतंत्र उपचार पद्धती यशस्वीपणे राबवत असल्याचं रोहित पावर म्हणाले आहेत.

ICMR मान्यताप्राप्त औषधांचा वापर

या हॉस्पिटलच वैशिष्ट्य म्हणजे या हॉस्पिटलमध्ये रूग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष, उपचार प्रणालीचा उपयोग केला जातोय. एकीकडे राज्यात रेमडेसिव्हीर औषधाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या औषधाचा तुटवडादेखील निर्माण झाला आहे. मात्र या हॉस्पिटलमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शन रुग्णांना दिले जात नाही. येथे रुग्णांवर उपचार करण्यासाठी ICMR मान्यताप्राप्त औषध आणि ऑक्सिजनचा पुरवठा कोरोनाबाधित रुग्णांना दिला जातो. विशेष म्हणजे यामुळे रुग्ण झपाट्याने बरे होताना दिसतायत.

डॉ. आरोळेंचे आरोग्यमंत्र्यांना पत्र

आरोळे यांनी वापरलेल्या उपचारप्रणालीचे केंद्राच्या पथकानेदेखील कौतुक केलंय. तसेच अशी उपचारप्रणाली सर्वत्र वापरावी असे पत्रही आरोळे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठवले आहे. या उपचारामुळे अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. त्यामुळे रुग्णांनीदेखील याबाबत समाधान व्यक्त केलं आहे.

दरम्यान, या हॉस्पिटलमध्ये दिले जाणारी औषधी अत्यंत स्वस्त आहेत. तसेच येथे कोणतेही महागडे उपचार घेण्याची गरज रुग्णांना पडत नाही. डॉ. आरोळे यांच्या उपचारामुळे मोठ्या प्रमाणात फरक पडत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या