Ticker

6/Breaking/ticker-posts

केंद्राच्या सहकार्याशिवाय लसीकरणात राज्याला प्रगती करता आली असती का? विखे पाटलांचा सवाल

 






लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर:- लस पुरवठ्यात केंद्र सरकार  दुजाभाव करीत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते करीत आहेत, तर दुसरीकडे राज्य लसीकरणात आघाडीवर असल्याचे सांगून पाठ थोपटून घेत आहेत. जर केंद्राने दुजाभाव केला असता तर महाराष्ट्राला एवढी लस मिळाली असती का? केंद्राच्या सहकार्याशिवाय लसीकरणात राज्याला प्रगती करता आली असती का? असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.


प्रसार माध्यमांशी संवाद साधताना विखे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केंद्र सरकारवर केल्या जाणाऱ्या टीकेचा समाचार घेतला. सध्या करोना परिस्थिती हातळण्यात सरकारचा गहाळपणा होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

विखे पाटील म्हणाले, ‘राज्य सरकारने दुसऱ्या लॉकडाउनची घोषणा केली, मात्र पहिल्या लॉकडाउनच्या काळात मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना मदतीच्या ज्या घोषणा केल्या होत्या, त्याची पूर्तता झाली का? मुख्यमंत्र्याच्या मगील घोषणेनंतरही गरजूना धान्य मिळालेले नाही. सामान्य माणसाची उपासमार सुरूच आहे. आता किमान दुसऱ्यांदा झालेल्या घोषणांची तरी अंमलबजावणी व्हावी. देशात करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला. असे असूनही केंद्र सरकार लसीकरणात दुजाभाव करते हा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचा आरोप आश्चर्यकारक वाटतो. एकीकडे राज्यात सर्वाधिक लसीकरण झाले म्हणून सरकार पाठ थोपटून घेतय. मग केंद्राच्या सहकार्याशिवाय हे लसीकरण झाले काॽ आपण काय बोलतोय याचे भान आघाडीच्या मंत्र्यांनी ठेवायला हवे. एक मे पासून लसीकरणासाठी सर्वच राज्यांनी पुढाकार घेतला आहे,’ याकडेही विखे यांनी लक्ष वेधले.



महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून अहमदनगर जिल्ह्यातील करोना परिस्थिती हातळण्यात यंत्रणा कमी पडत असल्याचे कळविले आहे. त्याबद्दल बोलताना विखे म्हणाले, ‘महसूल मंत्र्यांनी लिहिलेले हे पत्र म्हणजे स्वत:ची अब्रू झाकण्याचा प्रकार आहे. एक वर्षापासून करोनाचे संकट आहे. महसूल मंत्र्याना सुविधांचा अभाव असल्याचे आता कळाले काॽ फक्त फार्स करायचा आणि स्वतःचे अपयश झाकण्यासाठीचा हा पत्रव्यवहार आहे,’ असा आरोपही त्यांनी केला.

अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्लीहून रेमडेसिवीर इंजेक्शन आणून वाटल्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. त्यावर प्रतिक्रिया देण्यास मात्र विखे यांनी नकार दिला. हे प्रकरण न्यायप्रवीष्ट असल्याने त्यावर अधिक बोलणे उचित होणार नाही. न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. डॉ. सुजय यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून हे काम केले आहे,’ असे विखे पाटील म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या