Ticker

6/Breaking/ticker-posts

लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही ! ; मुख्यमंत्री घेणार लवकरच मोठा निर्णय

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई: राज्यातील करोना स्थितीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊनवर सर्वांची मते जाणून घेण्यात आली. यावेळी तज्ज्ञांचा हवाला देत मुख्यमंत्री ठाकरे यांनी कडक लॉकडाऊन आवश्यक असल्याचे सांगितले. त्यावर अंतिम निर्णय मात्र झाला नसून उद्या किंवा परवा लॉकडाऊनबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे

सर्वपक्षीय बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या कोविड टास्क फोर्सची बैठक घेणार आहेत. या बैठकीत राज्यातील कोविड स्थितीचा सर्वंकष आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर टास्क फोर्सच्या शिफारशीनुसार पुढील पावले टाकली जाणार आहेत. राज्यातील स्थिती पाहता ८ ते १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावला जाण्याची दाट शक्यता आहे. तसे स्पष्ट संकेत मिळत आहेत.


मुख्यमंत्री ठाकरे यांनी आजच्या बैठकीत अगदी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. करोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे. विरोधी पक्ष नेत्यांनी दिलेल्या सूचनांवर निश्चितपणे गांभीर्याने विचार केला जाईल, त्यांनी चांगल्या सूचना मांडल्या आहेत. विशेषत: रेमडीसिव्हीर उपलब्धता, चाचण्यांचे रिपोर्ट्स लवकर मिळणे, प्रयोगशाळाना यासाठी सूचना देणे, ऑक्सिजन उपलब्ध व्हावा म्हणून काटेकोर नियोजन अशा त्यांच्या सूचनांवर शासन कार्यवाही करेल. आपण हे सर्व काही करू पण या क्षणाला वेगाने वाढणारी रुग्णवाढ थांबवायची कशी हा प्रश्न आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लोक घरी होते. त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे सोपे होते. आता जेव्हा सर्व खुले झाले हे तेव्हा यात व्यावहारिक अडचणी येतात ते केंद्राने समजून घ्यावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.


एकीकडे लसीकरण वाढविण्याची खूप गरज आहे. ब्रिटनने दोन अडीच महिने कडक लॉकडाऊन केला पण त्या काळात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवून नागरिकांना संरक्षित केले. आज युवा पिढीला लस देण्याची गरज आहे. फायझर कंपनी तर १२ ते १५ गटातील मुलांना लस देण्याचे नियोजन करतेय, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कडक निर्बंध लावताना गरीब, श्रमिक, हातावर पोट असणाऱ्या वर्गाला त्रास होऊ नये ही सर्वांचीच भूमिका आहे. त्यादृष्टीने जरुर विचार झाला पाहिजे आणि केला जाईल पण दररोज झपाट्याने वाढणारा संसर्ग आणि रुग्णवाढ काहीही करून प्रथम रोखणे अतिशय गरजेचे आहे. सर्वानुमते एकमुखाने निर्णय घेऊन या संकटावर मात कशी करावी ते ठरविले पाहिजे. यासाठी लोकांमध्ये आपण सर्व पक्षांनी जागृती केली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढते आहे की, आज आपण लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवेल. करोना सर्वानांच टार्गेट करीत आहे. त्यात सगळे आले. हातावर पोट असलेला वर्ग सगळ्या विभागांत आणि क्षेत्रात आहे त्यामुळे विचार करायचा तर सगळ्यांचाच करावा लागतो. आज परिस्थिती बिकट बनत चालली आहे. टास्क फोर्सच्या तज्ञांचे म्हणणे देखील आम्ही सातत्याने विचारात घेत आहोत. एका बाजूला जनभावना आहे पण दुसऱ्या बाजूला करोनाचा उद्रेक आहे, अशा परिस्थितीत ही लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ तर काढावीच लागेल, अशी कठोर भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. मी गेल्या काही दिवसांपासून विविध क्षेत्रातील लोकांशी बोलतो आहे, काल मी खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी पण बोललो. राज्य शासनाला सहकार्य करण्याची सगळ्यांची तयारी आहे. म्हणून सर्व पक्षीय नेत्यांना माझे आवाहन आहे की राज्यातील जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन जो काही निर्णय घेतला जाईल त्याला आपले सहकार्य द्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसेच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फड्णवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांतदादा पाटील आदींनी सहभाग घेऊन आपल्या सूचना मांडल्या. प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी कोविड परिस्थिती आणि निर्माण झालेल्या आव्हानाला शासन कसे तोंड देत आहे त्याची माहिती दिली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या