Ticker

6/Breaking/ticker-posts

'युतीत असताना बाळासाहेब तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते’, आता..? सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच..!

 


लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क).

अहमदनगर: 'युतीत असताना बाळासाहेब ठाकरे हे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता तुम्ही त्यांच्याकडं फक्त उद्धवजींचे वडील म्हणून पाहता? भावना आणि भूमिका सत्तेच्या पलीकडील असतात, असं ऐकलं होतं. परंतु आपल्या भावना सत्ता जाताच बदलल्या. अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच,' अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला सुनावलं आहे.

देश करोनाच्या संकटात असताना व राज्यांवर आर्थिक अरिष्ट कोसळलं असतानाही दिल्लीत हजारो कोटींच्या नव्या संसद भवनाचं काम सध्या सुरू आहे. रोहित पवार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं होतं. केंद्र सरकारनं प्राधान्यक्रम ठरवण्याची गरज आहे, असं मतही त्यांनी मांडलं होतं. त्यांच्या या ट्वीटवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी खोचक प्रतिक्रिया दिली होती. ' मुख्यमंत्री ४०० कोटी रुपये खर्चून वडिलांचे स्मारक उभरताय, त्यांना हा प्रश्न विचारा. आपल्या गृहमंत्र्याने फक्त मुंबईतून केलेली वसुली दीड हजार कोटी आहे म्हणतात, ती रक्कम लसीकरणासाठी वळवा,' असं भातखळकर म्हणाले होते. त्यांच्या या सल्ल्यावर रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे. ' कालपर्यंत हिंदुहृदयसम्राट असलेले बाळासाहेब ठाकरे आज भाजपसाठी फक्त उद्धवजींचे वडील आहेत? सत्ता जाताच तुमच्या भावना बदलल्या,' असा सणसणीत टोला रोहित यांनी हाणला आहे.

आपल्या ट्वीटमध्ये रोहित पवार म्हणतात, 'संसद निश्चित महत्वाची आहे पण आज लोकांचा जीव महत्त्वाचा असल्यानं सगळे स्रोत आरोग्य व्यवस्था बळकट करण्याकडं वळवणं गरजेचं असताना करोनाच्या संकटातही कामगारांना ओढून आणून संसदेचं काम पूर्ण करण्याचा अट्टहास कशासाठी?

' राज्याची स्थिती नाजूक असतानाही राज्यानं लसीकरणाचा भार उचलण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारप्रमाणे लसीकरणाची जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलली नाही. केंद्र सरकारनं यंदा महाराष्ट्राचे हक्काचे  GST चे २०८३३ कोटी बुडवले. २४ ते ३० एप्रिलसाठी ४.३४ लाख रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याची घोषणा करूनही राज्याला कालपर्यंत केवळ २.२४ लाख इंजेक्शन्स मिळाले. महाराष्ट्राची कोंडी होत असताना आपण मात्र मौन बाळगता! आपला मराठी बाणा दिल्लीसमोर झुकला की काय?,' असा रोकडा सवालही रोहित यांनी भातखळकरांना केला आहे.

थोडा धीर धरा !

अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांबाबत त्यांनी भाजपला उत्तर दिलं आहे. ' या प्रकरणाची सीबीआय चौकशी पूर्ण होऊ द्या. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तोवर थोडा धीर धरत राजकीय पतंगबाजी टाळली तर बरं होईल. राजकीय वक्तव्य करण्याची ही वेळ नाही. इथं लोकांचे प्राण पणाला लागले आहेत हे विसरू नका,' असं रोहित पवार यांनी सुनावलं आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या