Ticker

6/Breaking/ticker-posts

निवडणूक आयोग बाहुलं बनला आहे – शिवसेना

 भाजप उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम; शिवसेना म्हणते, झोलबाजीवर शिक्कामोर्तब



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

मुंबई: आसामच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी चक्क भाजप उमेदवाराच्या गाडीतून इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रांची (EVM) वाहतूक केल्यामुळं देशभर गदारोळ सुरू आहे. विरोधी पक्षांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेनेनं भाजपबरोबरच निवडणूक आयोगावरही कडवट शब्दांत टीका केली आहे. ' ईव्हीएमवरील उरलासुरला विश्वास उडविण्याबरोबरच निवडणूक आयोगाच्या झोलबाजीवर या प्रकारामुळं शिक्कामोर्तब झालंय,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

आसाममधील पथारकांडी मतदारसंघात निवडणूक आयोगाची गाडी भररस्त्यात खराब झाली. त्या गाडीत मतदानयंत्रे होती. निवडणूक आयोगाची गाडी बंद पडताच तेथे एक गाडी प्रकट झाली. त्या गाडीत निवडणूक आयोगाचे अधिकारी ईव्हीएमसह बसले व रवाना झाले. ही गाडी त्याच मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कृष्णेंदू पॉल यांची होती. ही माहिती पुढं आल्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकार व भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेनेनंही 'सामना'च्या अग्रलेखातून या धक्कादायक प्रकारावर भाष्य केलं आहे.

शिवसेना म्हणते...

*आपल्या देशाचा निवडणूक आयोग मृत झाला आहे किंवा राज्यकर्त्या पक्षाच्या हुकमाचा विकलांग ताबेदार बनला आहे. निवडणूक आयोगानं निवडणुकांत सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेत वावरू नये या अपेक्षेला येथे तडे गेले आहेत.

*मतदान यंत्रे नेण्यासाठी निवडणूक आयोगास भाजपच्या उमेदवाराच्या गाडीशिवाय दुसरी गाडीच मिळू नये? हा कसला योगायोग? निवडणूक आयोगाची ही भूमिका संशयास्पदच नाही, तर लफंगेगिरीची आहे. या सर्व प्रकरणात निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपचा मुखवटा फाटला आहे.

*निवडणूक आयोग पक्षपाती आहे हे सिद्ध करणाऱ्या घडामोडी रोज घडत आहेत. भाजप नेते हेमंत बिस्वा शर्मा यांनी आसाममधील एका छोट्या पक्षाच्या प्रमुखाला एनआयएची भीती दाखवून तुरुंगात पाठविण्याची धमकी दिली. त्यांच्यावर निवडणूक आयोगानं लादलेली ४८ तासांची प्रचारबंदी लगेच कमी करून २४ तासांवर आणली. हे सर्व निर्णय कोणाला तरी खूष करण्यासाठीच घेतले गेले आहेत. निवडणूक आयोगाच्या इतिहासातील ही काळी पाने आहेत. लोकशाहीला डागाळणारी ही कृत्ये आहेत.

*टी. एन. शेषन यांची आठवण पदोपदी यावी असं दुर्वर्तन सध्याचा निवडणूक आयोग पावलोपावली करीत आहे. प. बंगालात युद्धासारखीच स्थिती निर्माण झाली आहे. भाजपनं प. बंगालात जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणास लावणं हे ठीक आहे, पण त्या शक्तिमान रथाचे घोडे म्हणून निवडणूक आयोगानं स्वतःच दावणीला बांधून घ्यावे हे बरोबर नाही.

*आज लोकांचा निवडणुकीवरचा विश्वास उडाला आहे. नागरिकांचं मत नक्कीच बहुमोल आहे, पण आपण दिलेलं मत नक्की कोणाला गेलं याबाबत मतदारालाच शंका येते, तेव्हा निवडणूक आयोग कुचकामी किंवा कोणाच्या तरी हातचं बाहुलं बनला आहे याची खात्री पटते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या