Ticker

6/Breaking/ticker-posts

' महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत जनतेने का मोजावी?'

 राज्यातील लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या भाजपवर शिवसेनेचा घणाघात



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई: 'नोटाबंदी, लॉकडाऊन याची ओळख पंतप्रधान मोदींनीच देशाला करून दिली आहे. वर्षभरापूर्वी मोदींनी केलेल्या लॉकडाऊनचं भाजप कार्यकर्त्यांनी थाळ्या वाजवून स्वागत केलं होतं. आज करोनाची परिस्थिती आधीपेक्षा जास्त गंभीर झाली आहे याचं भान महाराष्ट्रातील विरोधी पक्षानं ठेवायला हवं. महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी?,' असा सणसणीत टोला शिवसेनेनं हाणला आहे. 

राज्यात करोना रुग्णसंख्येचा आकडा दररोज ५० ते ६० हजारांनी वाढत आहे. त्यावर उपाय म्हणून संपूर्ण लॉकडाऊनची तयारी राज्य सरकारनं चालवली आहे. येत्या १४ एप्रिलाल त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, विरोधी पक्षाने लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. अर्थचक्र बिघडेल आणि लोकांचा उद्रेक होईल असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी म्हटलं आहे. शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून विरोधकांच्या या भूमिकेचा समाचार घेतला आहे. ' लॉकडाऊनमुळं अर्थचक्र बिघडेल हे विरोधी पक्षाला वाटणं स्वाभाविक आहे, पण सध्या माणसांचे प्राण गमावण्याचे जे अनर्थचक्रसुरू आहे. १५ एप्रिलनंतर राज्याची करोना स्थिती गंभीर होईल असं मुख्य सचिव सीताराम कुंटे हेच जेव्हा सांगतात, तेव्हा त्याचं गांभीर्य विरोधी पक्षानं समजून घ्यायला हवं. अर्थचक्र की अनर्थचक्र?’ यावर तत्काळ निर्णय घ्यायलाच हवा,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

' मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसारखी ठिकाणे हॉटस्पॉट बनली आहेत.  देशातला करोना संसर्गाचा आकडा दीड लाखांच्या पुढं गेला आहे. हे चित्र धक्कादायक आहे. त्यामुळं या संकटाकडं राजकारणाच्या पलीकडं जाऊन पाहायला हवं. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री नाही याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेने का मोजावी? आणि बाजूच्या गुजरात राज्यात भाजपचं राज्य असूनही तिथं कोरोना आटोक्यात आलेला नाही. उलट सुरत, अहमदाबादेत करोनाचं रुग्ण रस्त्यावर, फुटपाथवर पडेपर्यंत प्रकरण हाताबाहेर गेलं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी हे या गंभीर परिस्थितीतही लॉक डाऊन लावायला तयार नाहीत. कारण व्यापारी मंडळींचं नुकसान होईल. व्यापाऱ्यांचा पक्ष फक्त व्यापाऱ्यांचाच विचार करीत असेल तर करोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक उग्र रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही,' असंही शिवसेनेनं सुनावलं आहे.

' व्यापार, उद्योग, शाळा, राजकारण, मंदिर, मशिदी जिथल्या तिथंच राहतील. मात्र  माणूसच जिवंत राहिला नाही तर काय कराल? या जगात माणसाच्या जिवाशिवाय दुसरं काहीच मोलाचं नाही. ना ईश्वर, ना धर्म, ना पैसा, ना राजकारण! तेव्हा करोना संकटप्रश्नी कोणीही राजकीय धुळवड करू नये हेच बरं,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

लॉकडाऊनमुळे ज्या गोरगरीबांचे पोट मारले जाणार आहे, त्यांना जगण्यापुरती आर्थिक मदत करावी व अशा गरजूंच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हावी ही सूचना चांगली आहे व त्या कामी केंद्र सरकारला महाराष्ट्र सरकारला सढळ हस्ते मदत करावी लागेल. केंद्र सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही, पळ काढता येणार नाही. शेवटी देश मोदींच्याच नावाने चालत आहे व प्रत्येक लसीपासून लॉकडाऊनपर्यंत मोदी नामाचाच उत्सव सुरू असताना राज्यांना मदत करून उत्सवाचे रंग अधिक तेजोमय करणे हे केंद्राचेच कर्तव्य ठरत नाही काय? राज्यातील विरोधी पक्षाने दिल्लीत जाऊन महाराष्ट्राची ही बाजू भक्कमपणे मांडली तर राज्यहिताचे श्रेय त्यांनाच मिळेल व लॉकडाऊन झाले तरी जनतेला दिलासा देता येईल, असा खोचक सल्लाही शिवसेनेनं दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या