Ticker

6/Breaking/ticker-posts

.. म्हणून काँग्रेस लवकरच सत्तेतून बाहेर; रामदास आठवलेंच भाकित

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

सातारा: राज्यात काँग्रेस  पक्ष  हा महाविकासआघाडीवर नाराज असून हा पक्ष सत्तेतून लवकरच बाहेर पडेल आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष  सत्तेवर येईल, असे भाकित केंद्रीय मंत्री रामदास आठवले  यांनी केले आहे. हे सरकार आणखी किती दिवस सत्तेवर राहील याबाबत आपल्या मनात शंका असल्याचेही ते म्हणाले. 
केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सातारा येथे पत्रकारांशी बोलत होते. ते गेल्या दोन दिवसांपासू सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांनी वाई आणि महाबळेश्वरला भेट दिली. रविवारी ते साताऱ्यात आले.

काँग्रेसला सरकारमध्ये सन्मान मिळत नाही
महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला पाहिजे तेवढा सन्मान मिळत नाही. यामुळे हा पक्ष नाराज असून तो किती दिवस महाविकासआघाडीसोबत राहील याबाबत सांगता येत नाही. म्हणूनच हे सरकार आणखी किती दिवस सत्तेवर राहील याबाबत आपल्या मनात शंका असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

काँग्रेसने जर महाविकास आघाडीचा पाठिंबा काढला तर महाविकास आघाडी सरकार पडेल. बाळासाहेब ठाकरे यांना जे मान्य नव्हते तेच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला विरोध केला. त्याच पक्षांसोबत उद्धव ठाकरे त्यांनी सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे मतभिन्नता असलेल्या पक्षांमध्ये नाराजीचा सूरही ऐकायला मिळत आहे, असे आठवले म्हणाले. इतकेच नाही तर सरकारच्या एकूण कारभारावर देखील काँग्रेस पक्ष नाराज आहे. हे लक्षात घेता जर का काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला, तर हे सरकार पडू शकते, असेही ते पुढे म्हणाले.

भाजपच्या संपर्कात अनेक आमदार
भाजपाच्या संपर्कात राज्यातील अनेक आमदार असल्याचेही आठवले यांनी सांगितले. भाजपाला सत्तेवर येण्यासाठी फक्त २८ आमदारांची गरज आहे . निवडणूक टाळली जावी यासाठी राज्यातील अनेक आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. हे लक्षात घेतले तर लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन होईल असे वाटते असेही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या