Ticker

6/Breaking/ticker-posts

नगरकरांचे हक्काचे पाणी पुणे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पळविले ;. खासदार डॉ. सुजय विखे पाटील

  










लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर :. दि. २ ऑक्टोबर २२

अहमदनगर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पळविले असून आत्तापर्यंत त्यांनी नगरच्या शेतकर्‍यांवर अन्यायच केला आहे. जलसंपदा खात्यावर असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढणार असून नगरकरांना हक्काचे पाणी मिळवून देणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान नगरकरांचे हक्काचे पाणी पुणे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पळविले असल्याचा आरोपही त्यांनी केला. 


शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, माजी राज्यमंत्री शिवाजी कर्डिले, जगन्नाथ भोर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अभिलाश घिगे, माजी उपसभापती रेवननाथ चोभे,   संचालक दिलीप भालसिंग, पंचायत समितीचे माजी सदस्य रविंद्र कडूस, दीपक कार्ले, सुधीर भापकर, सरपंच शरद बोठे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. 


खा. विखे म्हणालेे,  लोकसभा निवडणूक प्रचारावेळी नगर तालुक्यातील वाळकी येथे रखडलेली साकळाई योजना मागणी मार्गी लावण्याचा शब्द दिला होता. नंतर विधानसभा निवडणुका होऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. गेल्या अडीच वर्षात कुकडी प्रकल्पामध्ये साकळाई योजनेसाठी पाणी शिल्लक नव्हते. परंतु, महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या उंबरठ्यावर असतांना २८ जून २०२२ रोजी कुकर्डी प्रकल्पात ४.९४ टीएमसी पाणी शिल्लक असल्याचे अधिकार्‍यांनी अहवालात दाखविले. अहवालात दाखविलेले उपलब्ध तीन टीएमसी पाणी पुणे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तातडीने पळविण्याचा घाट घातला होता. परंतु, तो आम्ही हाणून पाडला. उपलब्ध असलेले तीन टीएमसी पाणी साकळाई योजनेसाठी देण्याची मागणी आमदार पाचपुते, माजी राज्यमंत्री कर्डिले व भाजपाचे पदाधिकारी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यांनीही लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्यासाठी लागलीच साकळाई योजनेच्या सर्व्हेक्षणास तातडीने मंजुरी दिली. साकळाई योजना पूर्ण करण्यासाठी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे खा. विखे यांनी सांगितले. 


साकळाई योजनेच्या सर्व्हेक्षणास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मंजुरी दिली असून दोन महिन्यांतच सर्व्हेक्षण पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत. १५ दिवसांच्या आत निविदाही काढली जाणार आहे. 


नगरच्या लोकप्रतिनिधींचा खरा चेहरा समोर आणणार

गेले अडीच वर्ष राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. गतवर्षी नगरकरांच्या हक्काच्या असणार्‍या २२ टीएमसी पाण्यापैकी केवळ १५ टीएमसी पाणी मिळाले, त्या अगोदर फक्त ९ टीएमसी पाणी मिळाले. नगरकरांच्या हक्काचे राहिलेले पाणी कुणी पळविले असा सवाल खासदार सुजय विखे पाटील यांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नगरकरांचे हक्काचे पाणी पुण्याचे राष्ट्रवादीचे नेतेमंडळी पळवित होते, त्यावेळी नगरच्या लोकप्रतिनिधींनी आवाज का उठवला नाही, नगरच्या शेतकर्‍यांचे त्यांना काही देणे घेणे नाही का याचा खुलासा राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींनी करावा, अन्यथा त्या राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींचा खरा चेहरा जनतेसमोर आणणार असल्याचे खा. विखे म्हणाले. 



साकळाईचे पाणी आल्यावर 'त्यांनी' जलसमाधी घ्यावी - कर्डिले

साकळाई योजनेसाठी काहींनी मुंबई पर्यंत पायी मोर्चा काढला तसेच पाणी न मिळाल्यास जलसमाधी घेणार असल्याचे सांगितले. आता आमच्या सरकारच्या काळात साकळाई योजनेच्या सर्व्हेक्षणास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे साकळाई योजना आता पुर्णच होणार आहे. त्यामुळे साकळाईसाठी जलसमाधी घेणारांनी आता पाणी आल्यावर तरी जलसमाधी घ्यावी असा टोला माजी राज्यमंत्री शिवाजी कर्डिले यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांना लगावला. 

रास्तारोको आंदोलन स्थगित

साकळाई योजना मार्गी लागावी यासाठी साकळाई कृती समितीच्यावतीने २ ऑक्टोबर रोजी नगर दौंड महामार्गावर चिखली जुना टोलनाका येथे रास्तोरोको करण्याचा इशारा दिला होता. परंतु, नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीमध्येे साकळाई योजनेच्या सर्व्हेक्षणास मंजुरी दिली आहे. त्यामुळे २ ऑक्टोबर रोजी होणारे रास्तारोको आंदोलन साकळाई कृती समितीने स्थगित केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या