Ticker

6/Breaking/ticker-posts

पीक नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी ७२ तासाच्या आत विमा कंपनीस द्यावी; कृषी विभागाचे आवाहन

 


  




लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)     

अहमदनगर दि.22 - जिल्ह्यात ६१ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास ७२ तासाचे आत पीक विमा कंपनीस कळवावे.  शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहू नये, यासाठी तालुका कृषी अधिकारी अथवा कृषी विभागाशी संपर्क साधावा. असे आवाहन अहमदनगरचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवाजी जगताप यांनी  केले आहे.


            जिल्ह्यात जून ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत ५१८.१६ मि.मि. म्हणजेच ११५.६३ टक्के पाऊस झाला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम-२०२२ मध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक विमा कंपनीकडे तक्रारी प्राप्त होत आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी नुकसानीची पूर्वसूचना घटना घडल्यानंतर ७२ तासाचे आत विमा कंपनीस कळविणे आवश्यक आहे.


            प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन २०२२ साठी अहमदनगर जिल्हयासाठी एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स या कंपनीची नेमणूक करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीची पूर्व सूचना देण्यासाठी क्रॉप इन्शुरन्स अॅप गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.  एचडीएफसी इर्गो पिक विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक १८०० २६६०७०० असा आहे. विमा कंपनीचे तालुकास्तरीय प्रतिनिधी तसेच  तालुका कृषी अधिकारी यांना कार्यालयात प्रत्यक्ष नुकसानीची माहिती देता येईल. विमा कंपनीचा pihu व्हॉटसअप क्रमांक  ७३०४५२४८८८  असून पिक विमा कंपनीची selfhelp link https://customersupport.hdfcergo.com/selfhelp/RABG Claim.aspx आहे. या माध्यमातून ही शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीच्या नुकसानीची माहिती देता येईल.


            पिकाच्या नुकसानीचे फॉर्म पुरेशा प्रमाणात विमा कंपनी व तालुका कृषि अधिकारी कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.अशी माहिती ही श्री.जगताप यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या