Ticker

6/Breaking/ticker-posts

राजू शेट्टींचे जलसमाधी आंदोलन तात्पुरतं स्थगित; मुख्यमंत्र्यांचा 'हा' प्रस्ताव

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

कोल्हापूर : पूरग्रस्तांच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलनाचा निर्णय अखेर माजी खासदार राजू शेट्टी यांनी सायंकाळी मागे घेतला. सोमवारी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलविल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा केली. दरम्यान , बैठक निष्फळ झाल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.


कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे या भागातील शेतकरी आणि इतर सर्वांचेच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्वाना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची फी माफ करावी, शेतकऱ्यांना पन्नास हजाराचे प्रोत्साहनात्मक अनुदान तातडीने द्यावे यासह विविध मागण्यासाठी शेट्टी यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यासाठी गेले पाच दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पंचगंगा परिक्रमा पदयात्रा सुरू होती.

नृरसिंहवाडी येथे ही पदयात्रा सायंकाळी पोहोचली. तेथे झालेल्या सभेत शेट्टी यांनी जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याची घोषणा केली. राज्य सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घेत सोमवारी  मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबतचा प्रस्ताव इचलकरंजीचे प्रांताधिकारी विकास खरात यांनी शेट्टी यांना दिला. त्यानंतर शेट्टीने हे आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली.

दरम्यान पूरग्रस्तांच्या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघट्ना आक्रमक झाली असून तीन हजारावर कार्यकर्ते जलसमाधी घेण्यासाठी नृसिंहवाडीच्या दिशेने आले होते. काही कार्यकर्त्यांनी थेट पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमात उडी मारल्याने वाडीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

पाच दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रयाग चिखली येथून पंचगंगा परिक्रमा यात्रा काढली. दुपारनंतर यात्रा कुरूंदवाड येथून वाडी च्या दिशेने निघाली. कुरुंदवाडच्या पुलावर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हजारावर पोलीस कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी सज्ज होते. पण कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्यामुळे तेथे तणावपूर्ण वातावरण निर्माण होण्याची शक्यता होती.

सायंकाळी पाचनंतर जाहीर सभा होऊन थेट जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. नदीपात्राकडे एकही कार्यकर्ता जाऊ नये यासाठी नदीच्या दोन्ही बाजूला मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हा बंदोबस्त चुकवत काही कार्यकर्त्यांनी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास नदीत उडी मारली. त्यांना यांत्रिक बोटींच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या