Ticker

6/Breaking/ticker-posts

१२ आमदारांच्या यादीतून राजू शेट्टींचे नाव वगळले?; अजित पवार म्हणतात...

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

 पुणेः 'आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने 'मंदिरे सुरू करा' या भावनिक मुद्द्यातून काही साध्य करता येऊ शकते का, हे आजमविण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत,' असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांना शुक्रवारी लगावला.

'करोनाच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री वारंवार आवाहन करत असताना काही जण राजकारण करून सण साजरे करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सगळे थांबले पाहिजे, अन्यथा तिसरी लाट आल्यावर पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या' म्हणत सर्व बंद करण्याची वेळ येऊ नये,' असेही त्यांनी बजावले.

ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर उपमुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते.दिवाळी संपल्यावर शाळा सुरू कराव्यात किंवा शून्य टक्के पॉझिटिव्हीटी आहे, तिथे शाळा सुरू कराव्यात असे मतप्रवाह आहे. याबाबत मुख्यमंत्री टास्क फोर्सच्या तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नावांमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचे नाव वगळल्याच्या चर्चांबाबत विचारणा केली असता, या बातम्या चुकीच्या असून, असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. राज्यपालांशी राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याबाबत विचारणा केली असता, 'अनेक लोकांना करोनाची भीती राहिलेली नाही. मास्क, सुरक्षित वावराचे नियम पाळले जात नाही. करोना संपला असा गोड समज काही लोकांनी करून घेतला आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या