Ticker

6/Breaking/ticker-posts

कर्जत-जामखेड पाठोपाठ राष्ट्रवादीचा राहुरीतही भाजपला धक्का !

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अहमदनगर : नगरपालिका निवडणुकाच्या तोंडावर कर्जत-जामखेड मध्ये भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीने भाजपला तसाच धक्का आता राहुरीतही दिला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नेतृत्व स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

राहुरी नगरपरिषदेतील भाजपचे नगरसेवक शहाजी जाधव यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याशिवाय मतदारसंघातील ग्रामीण भागातील धनगरवाडीचे सरपंच, सदस्य, तसेच इतर ठिकाणच्या काही भाजपच्या कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राज्यमंत्री तनपुरे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना तनपुरे म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या शिकवणीप्रमाणे राष्ट्रवादीत येणाऱ्या प्रत्येकाचा योग्य तो सन्मान राखला जाईल. पक्षावर विश्वास ठेवून प्रवेश करणाऱ्या सर्वांचे स्वागत आहे.

भाजप नेते शिवाजीराव कर्डिले पूर्वी या मतदारसंघातून आमदार होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत तनपुरे यांनी त्यांचा पराभव केला. आता पुढील निवडणुकीसाठी कर्डिले यांनी तयारी सुरू केली आहे. राहुरीत अपयश आल्याने त्यांच्यापुढे विधान परिषेदेची स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढविणे तसेच पुढील निवडणुकीला राहुरी ऐवजी नगर तालुक्यालगतच्या श्रीगोंदा मतदारसंघातून निवडणूक लढविणे असे पर्याय असल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यातील त्यांच्या समर्थकांनी पक्ष सोडून विरोधी गोटात सामील होणे लक्षवेधी ठरत आहे. कर्जतमध्येही भाजपचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत आणि त्या आधी भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे नेतृत्व स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तेथेही भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांना या कार्यकर्त्यांनी धक्का दिला आहे.

 हे दोन्ही मतदारसंघ भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या लोकसभा मतदारसंघात येतात. लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ही पक्षांतरे सुरू झाली आहेत. कर्जत-जामखेड आणि राहुरी या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे युवा नेते प्रथमच आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. हा विजय मिळविताना त्यांनी भाजपच्या दिग्गज नेत्यांचा पराभव केला असून त्यानंतरही मतदारसंघावर आपली पकड मजबूत ठेवली आहे. आता भाजपच्या कार्यकर्त्यांना खेचून स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याची तयारी त्यांनी सुरू केल्याचे दिसून येते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या