Ticker

6/Breaking/ticker-posts

परीक्षा गोंधळ : तर.. आधीच्या व आपल्या सरकारमध्ये फरक तो काय ?

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर : विविध विषयांवर केंद्र सरकारपर्यंत टीका करणारे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आता. आरोग्य विभागाची भरती परीक्षा पुढे ढकलल्यानंतर उडालेल्या गोंधळाकडे लक्ष वेधत ट्वीट करून म्हटले आहे, ‘असंच चालू राहिलं तर आधीच्या आणि आपल्या सरकारमध्ये काय फरक राहील? याचा राज्य सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा.पवार यांच्या या प्रतिक्रियेचे युवा वर्गाकडून स्वागत करण्यात येत असले तरी अनेकांनी या भूमिकेवर आश्चर्यही व्यक्त केले आहे.


सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत गट क आणि गट ड प्रवर्गातील जागांसाठी होणारी भरती परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली. परीक्षेची जबाबदारी सोपविलेल्या न्यासा ही संस्था असमर्थ ठरल्यानेच परीक्षा पुढे ढकलावी लागल्याचे सांगण्यात आले. परीक्षेत अनेक गोंधळ निर्माण झाले होते. तशा अवस्थेत ही परीक्षा झाली असती तर अनेकांना त्यापासून वंचित राहावे लागले असते. मात्र, मोठ्या प्रतीक्षेनंतर ही भरती होत होती. तर तीही आता पुढे गेल्याने उमेदवारांमध्ये नाराजी आहे. या गोंधळाला सरकारला जबाबदार धरत सोशल मीडियातून रोष व्यक्त केला जात आहे.

 आता त्यांच्याच सुरात सूर मिसळविणारी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘मागील सरकारने आरोग्य भरती रखडवल्याने आरोग्य व्यस्था खिळखिळी झाली. आपल्या सरकारने आरोग्य भरती सुरू केली पण गोंधळाचं वातावरण दिसतंय. असंच चालू राहिलं तर आधीच्या आणि आपल्या सरकारमध्ये काय फरक राहील? याचा राज्य सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा. परीक्षा सुरळीत होणं आवश्यक होतं. अनेकांची आर्थिक स्थिती सामान्य आहे. परीक्षेला जाण्यासाठी त्यांनी उसने तर काहींनी व्याजाने पैसे आणले, परंतु आता त्यांना आर्थिक भुर्दंड बसलाय. त्यामुळं पुन्हा लवकर परीक्षा घ्यावी आणि त्यावेळी मोफत एसटी प्रवासाचा पर्याय देता येईल का, याचा विचार व्हावा. तसंच पारदर्शकतेसाठी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या देखरेखीत परीक्षा घेण्याबाबत विचार व्हावा. सध्या प्रत्येक पदासाठी व प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी फी आकारली जाते, हे योग्य नाही. सरकारने यात लक्ष घालून परीक्षार्थींच्या हिताचा निर्णय घ्यावा,’ असेही पवार यांनी सूचविले आहे. त्यांच्या या सडेतोड भुमेकेमुळे आपल्याच सरकारला घरचा आहेर मिळाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या