Ticker

6/Breaking/ticker-posts

गुलाब चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र, पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई : गुलाब चक्रीवादळ काल संध्याकाळी  उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण उडीशामधील कलिंगपट्टणम ते गोपाळपूरमध्ये धडकल्यानंतर चक्रीवादळाचा वेग कमी झाला आहे आणि हे चक्रीवादळ आता कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतरीत झाले आहे. दरम्यान, हे कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राकडे पुढे सरकत असल्यानं पुढील दोन ते तीन दिवस धुवांधार पावसाची शक्यता आहे. 

 आज विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. ज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी बघायला मिळणार आहे. सोबतच वाऱ्यांचा वेग देखील अधिक राहणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील चंद्रपूर, नांदेड, लातूर आणि उस्मानाबादेत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यात आजसाठी चारही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे ह्या जिल्ह्यात काही ठिकाणी 200 मिमीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. ह्या पावसामुळे कापणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील सोयाबीन आणि कापसाचं नुकसान होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसू शकतो. 

उद्या कोकण ,मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार

उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. ह्या दोन्ही विभागातील सात जिल्ह्यांना उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगावमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. ज्यात काही ठिकाणी 200 मिमीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यातआला आहे. मुंबई, पुणे, औरंगाबादसाठी उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. अशात ह्या भागात 64 मिमी ते 200 मिमीपर्यंत पावसाचा अंदाज असेल. दुसरीकडे, अरबी समुद्रात देखील वाऱ्यांचा वेगअधिक असल्यानं मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत. 

30 सप्टेंबरनंतर आणखी एक चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता

30 सप्टेंबरपर्यंत  हे कमी दाबाचे क्षेत्र गुजरातपर्यंत जाईल ज्यामुळे गुजरातमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, हे क्षेत्र अरबी समुद्रात गेल्यानंतर पुन्हा ह्या क्षेत्राचे रुपांतर अतीतीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होण्याची शक्यता आहे. ज्यात पुन्हा अरबी समुद्रात एक चक्रीवादळ 30 सप्टेंबरनंतर तयार होऊ शकतं. अशात, ह्या जर हे चक्रीवादळ तयार झाल्यास शाहीन असं ह्याचं नाव. असणार असून ते ओमानच्या दिशेने पुढे सरकेल. दरम्यान, अरबी समुद्रात जर चक्रीवादळ तयार झालं तर महाराष्ट्राला त्यापासून धोका नसेल. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या