Ticker

6/Breaking/ticker-posts

राणेंशिवाय पार पडणार जन आशीर्वाद यात्रा ?; भाजपने केली 'ही' मोठी घोषणा

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज रत्नागिरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली. राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू असतानाच ही कारवाई झाल्याने या यात्रेचं पुढे काय?, असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांना पडला असताना पक्षाकडून याबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे.


केंद्रातील मोदी सरकारमधील भाजपच्या नवीन मंत्र्यांची सध्या जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार ही यात्रा काढण्यात येत आहे. प्रत्येक मंत्र्याला त्यासाठी क्षेत्र नेमून दिलेलं आहे. या यात्रेच्या माध्यमातून मोदी सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचवली जात असून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शनही पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरुवातीपासूनच अनेक कारणांनी चर्चेत राहिली आहे. त्यात राणे यांनी या यात्रेदरम्यान सोमवारी आक्षेपार्ह विधान केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना त्यांची जीभ घसरली आणि कानाखाली आवाज काढण्याची भाषा त्यांनी केली. यावरून महाराष्ट्रात आज मोठा गदारोळ माजला. नाशिकमध्ये राणे यांच्याविरुद्ध शिवसेनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी राणेंविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचवेळी राज्यात तीव्र पडसादही उमटले. या सर्व पार्श्वभूमीवर रत्नागिरीत संगमेश्वर येथील गोळवलीत राणे पोहचले असता तिथे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या कारवाईने राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला ब्रेक लागेल, असे वाटत होते. मात्र भाजपने तातडीने त्याबाबत निर्णय घेतला आहे.

 

राणे यांना अटक झाली तरी जन आशीर्वाद यात्रा थांबणार नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. त्यानुसार राणेंच्या अटकेनंतर ही यात्रा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर  यांच्या नेतृत्वाखाली पुढे नेण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. तशी घोषणा करण्यात आली आहे. प्रवीण दरेकर हे मुंबईत होते. पक्षाच्या निर्णयानंतर ते तातडीने रत्नागिरीकडे रवाना झाले आहेत. रत्नागिरीत पोहचल्यावर संगमेश्वर येथे जाऊन ते यात्रा पुढे नेणार आहेत. राणे यांच्या यात्रेला १९ ऑगस्ट रोजी मुंबई येथून सुरुवात झाली. त्यानंतर पालघर जिल्ह्यातील वसई, विरार, नालासोपारा या भागांचा दौरा करून ते सोमवारी रायगड जिल्ह्यात पोहचले होते. रायगडमध्ये जनतेशी संवाद साधल्यानंतर ते आज रत्नागिरीतील संगमेश्वर येथे पोहचले होते. तिथे त्यांच्यावर कारवाई झाली. राणे यांचं होमपिच अर्थात सिंधुदुर्ग जिल्ह्यात यात्रा पोहचण्याआधीच त्यांना अटकेला सामोरं जावं लागलं

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या