Ticker

6/Breaking/ticker-posts

तणाव निवळेना; भाजपच्या आंदोलनात ठाकरे-पवारांविरुद्ध आक्षेपार्ह घोषणा

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिर्डीत भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. ज्येष्ठ नेते माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरुद्ध घोषणा दिल्या. पवार यांच्याविरुद्ध घोषणा देताना शारीरिक व्यंगाचाही उल्लेख करण्यात आला. आता आम्हालाही जुन्या घटना शोधून काढून तक्रारी द्याव्या लागतील, तेव्हा पोलीस त्या नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करणार का’, असा सवाल यावेळी विखे पाटील यांनी केला.

केंद्रीय मंत्री राणे यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी शिर्डी प्रांताधिकारी कार्यालयासमोर भाजपतर्फे निदर्शने करण्यात आली. राणे यांना सूडबुद्धीने अटक करण्यात आल्याचा आरोप करून त्या बद्दल सरकारचा निषेध करण्यात आला. यासंबंधीचे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले. मात्र, यावेळी घोषणाबाजी करताना कार्यकर्त्यांचा संयम सुटला. 

मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरुदध अपशब्द वापरून घोषणा देण्यात आल्या. तर पवार यांच्याविरुद्ध शारीरिक व्यंगाचा उल्लेख करून घोषणा देण्यात आल्या. पवार कुटुंबियांविरोधातही घोषणा दिल्या गेल्या. ही घोषणाबाजी सुरू असताना विखे-पाटील मात्र तेथे उपस्थित नव्हते. या आंदोलनात भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, किसान मोर्चाचे अध्यक्ष बाबासाहेब डांगे, युवा मोर्चाचे अध्यक्ष सतिष बावके, मुकुंदराव सदाफळ, भाऊसाहेब जेजूरकर यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आम्हीही तक्रार देऊ: विखे पाटील

शिवसेनेतील काही कथित नेते पंतप्रधान, गृहमंत्री, विरोधी पक्षनेते यांच्यावर सतत खालच्या पातळीला जाऊन टीका करतात. तरीही भाजपकडून कधीही अशा प्रकारे कारवाईचा बडगा दाखविला जात नाही. आता मात्र आम्हालाही त्यांच्या नेत्यांचे आमच्या नेत्यांवर अशी टीका केलेले जुने व्हिडिओ शोधून काढावे लागतील. तेव्हा पोलीस गुन्हे दाखल करून घेणार का?, असा सवाल यावेळी विखे पाटील यांनी केला. 

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की हीरक महोत्सव हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती नसावे हीच खरी शोकांतिका आहे. त्याबद्दल खरे तर मुख्यमंत्र्यांनी आधी माफी मागितली पाहिजे. माफी मागणार नसतील या प्रकरणी त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला पाहिजे. ठाकरे सरकारने राजकीय दहशतवाद सुरू केला आहे. पोलीस प्रशासनाचा वापर करून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. राजकीय सूडबुद्धीने कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही केली आहे, असेही विखे पाटील यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या